सातार्डा येथील जमीन मालकाला दिले पत्र
प्रतिनिधी / सावंतवाडी:
भारत संचार निगमला (बीएसएनएल) आता फंडाची कमतरता जाणवू लागली आहे. भाडय़ाने जमीन घेऊन टॉवर उभारलेल्या जमीनमालकांचे पैसे देण्यासाठी बीएसएनएलकडे सध्या फंड नाही. त्यामुळे या जमीन मालकांना बीएसएनएलकडून भाडे मिळणे मुश्किल झाले आहे. बीएसएनएलच्या असिस्टंट जनरल मॅनेजरनी तसे पत्र जमीन मालकाला दिले आहे.
बीएसएनएलने यापूर्वी आर्थिक परिस्थितीमुळे कर्मचाऱयांना स्वेच्छानिवृत्तीचा
प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव अनेक कर्मचाऱयांनी स्वीकारला. आता मोजक्याच कर्मचाऱयांमार्फत काम सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांना सेवाही व्यवस्थित मिळत नाही. असे असतांनाच आता बीएसएनएलकडे फंड नसल्याचे समोर आले आहे. टॉवरसाठी जागा दिलेले जमीन मालक त्यामुळे धास्तावले आहेत.
भारत संचार निगम ही देशातील अग्रगण्य दूरध्वनी, मोबाईल सेवा देणारी कंपनी होती. या कंपनीने ग्रामीण भागात आपले जाळे विणले होते. परंतु खासगी कंपन्यांच्या आगमनानंतर या कंपनीला वाईट दिवस येऊ लागले. खासगी कंपन्या या कंपनीला टेकओव्हर करून पुढे गेल्या. शासनाचे धोरण या कंपनीला अनुकूल असे राहिले नाही. त्यामुळे ही कंपनी स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत सेवा देण्यास कमी पडू लागली. असे असतांनाही कंपनीने टिकाव धरला. परंतु कर्मचाऱयांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास सांगण्यात आले. त्यामुळे कंपनीची परिस्थिती बिकट असल्याचे स्पष्ट झाले.
बहुतांश कर्मचाऱयांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यामुळे आता मोजक्याच कर्मचाऱयांच्या माध्यमातून कंपनीचा गाडा हाकला जात असताना या कंपनीकडे फंडाची कमतरता असल्याचे समोर आले आहे. सातार्डा येथील मनोहर शेलटे यांची जमीन भाडय़ाने घेऊन त्या जागेत बीएसएनएलने टॉवर उभारला होता. त्या टॉवरचे भाडे कंपनीने दिले नाही. याबाबत शेलटे यांनी विचारणा केली. त्यावेळी येथील कार्यालयाने भाडय़ाबाबत मुंबई सर्कल कार्यालयाला कळविण्यात आले. मात्र, फंडाची कमतरता असल्याने भाडे मिळण्यास विलंब होत आहे. फंड मिळाल्यानंतर भाडे देण्याची तरदूत करण्यात येईल, असे पत्र दिले आहे.