नवी दिल्ली / वृत्तसंस्था
वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकासाठी मुख्य दावेदारांपैकी एक असेल. तिला सुवर्ण जिंकण्याची यंदा उत्तम सुसंधी आहे, असे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी म्हटले आहे. भारतीय ऍथलिट्स यंदा ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच डबल डिजिटमध्ये पदके जिंकू शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. भारताचे 120 हून अधिक ऍथलिट टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.
‘लंडन ऑलिम्पिकमध्ये आपल्या पथकाने 6 पदके जिंकली होती. ती आता दुपटीने वाढवण्याची सध्याच्या संघात क्षमता आहे. सध्या प्रशासनाचे बरेच सहकार्य लाभते. त्याचा लाभ होऊ शकतो. नेमबाजी, कुस्ती, बॉक्ंिसग असेल किंवा वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू, या सर्वांना उत्तम संधी असेल’, असे गोपीचंद म्हणाले. हार्टफुलनेस इन्स्टिटय़ूट व ध्यान या भारतीय ऑलिम्पिक पथकाच्या मेडिटेशन पार्टनरनी संयुक्त विद्यमाने आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते.
गोपीचंद यांनी मागील 2 ऑलिम्पिकमध्ये अनुक्रमे कांस्य व रौप्य जिंकून देणाऱया सायना नेहवाल व पीव्ही सिंधू यांना प्रशिक्षण दिले असून भारतीय बॅडमिंटनपटूंना यंदाही उत्तम संधी असल्याचे त्यांचे मत आहे.
‘बॅडमिंटनमध्ये आपण यंदा रिओ व लंडनपेक्षाही अधिक सरस प्रदर्शन साकारु शकतो. आपल्या खेळाडूंमध्ये निश्चितपणाने ही क्षमता आहे. पीव्ही सिंधू सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार आहे. याशिवाय, चिराग-सात्विक यांना कठीण ड्रॉ मिळाला असला तरी ते सुद्धा पदक जिंकू शकतात. साई प्रणितचाही मार्ग कठीण आहे. मात्र, वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील फॉर्म येथेही साकारला तर यश फारसे दूर नसेल’, असे गोपीचंद यांनी पुढे नमूद केले.
यंदाचे ऑलिम्पिक नेहमीपेक्षा भिन्न
‘एरवी ऑलिम्पिक हा सर्वोच्च सोहळा असतो. ते एक सिलेब्रेशन असते. पण, यंदा परिस्थिती वेगळी आहे. विविध देशातील, प्रत्येक खेळातील सुपरस्टार तेथे असतात. ते यंदाही असतील. पण, यंदाच्या ऑलिम्पिकला वेगळीच किनार आहे. यंदा प्रत्येकाला फक्त आपल्या इव्हेंटवर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल आणि आपला इव्हेंट झाल्यानंतर 48 तासांच्या आत मायदेशी रवाना व्हावे लागेल. त्याशिवाय, जपानमध्ये असताना रोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम मास्क घालावा लागेल आणि टेम्परेचर तपासून पहावे लागेल. हे अर्थातच खूप कठीण असणार आहे’, असे ते पुढे म्हणाले.