आघाडीचा मल्ल सुशीलकुमारचे प्रतिपादन, टीकाकारांचा चोख समाचार, निवृत्तीची शक्यताही स्पष्टपणे फेटाळली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माझ्या टीकाकारांना मला विचारात न घेण्याची सवयच आहे. पण, अशा लोकांचा मी फारसा विचार करत नाही. त्याऐवजी माझ्या ध्येयाकडे वाटचाल कायम राखणे, हा माझा प्राधान्यक्रम आहे. यंदाची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षापर्यंत लांबणीवर टाकली गेल्याने ही बाब माझ्या पथ्यावरच पडली आहे. यामुळे, या स्पर्धेसाठी नव्याने तयारी करत मी ताज्या जोमाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याच्या निर्धाराने उतरेन, असा विश्वास भारताचा आघाडीचा मल्ल सुशीलकुमार याने केला.
36 वर्षीय सुशीलकुमारला ऑलिम्पिक पात्रतेसाठी बरेच झगडूनही यश मिळाले नव्हते. पण, ही स्पर्धाच एका वर्षाने लांबणीवर टाकली गेल्याने तो आता पात्रतेसाठी नव्याने प्रयत्न करु शकतो.
पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यंदा जुलै महिन्यात होणार होती. मल्ल सुशीलकुमारसह आघाडीचा टेनिसपटू लियांडर पेस याच्यासाठी देखील ही शेवटची ऑलिम्पिक ठरेल, अशी चिन्हे होती. पण, यंदाची स्पर्धाच एका वर्षाच्या फरकाने लांबणीवर टाकली गेली असल्याने बरीच समीकरणे बदलून गेली आहेत.
पुढील महिन्यात सुशीलकुमार 37 व्या वर्षी पदार्पण करत असून ऑलिम्पिक लांबणीवर टाकली गेल्याने त्याला साहजिकच तंदुरुस्त होण्यासाठी व स्पर्धेच्या तयारीसाठी पुरेसा वेळ लाभला आहे. 2019 मध्ये संपन्न झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने आपल्या गतवैभवाच्या पाऊलखुणा दर्शवणाऱया फॉर्मची प्रचिती आणून दिली. पण, नंतर अचानक त्याचा सूर हरवला आणि त्याचे आव्हान लवकरच संपुष्टात आले. अर्थात, ते अपयश आपण मागे सारले असल्याचा दावा हा अनुभवी मल्ल करतो.
‘कुस्ती हा असा खेळ आहे, ज्यात जर तुम्ही दुखापतीपासून दूर राहू शकला, उत्तम सराव करु शकला, आपले ध्येय सुनिश्चित करु शकला आणि त्यावर मेहनत घेऊ शकला तर ध्येयप्राप्ती निश्चित असते’, असे सुशीलने याप्रसंगी नमूद केले. सुशील हा वैयक्तिक क्रीडा प्रकारात दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारा एकमेव भारतीय क्रीडापटू आहे.
‘सध्या मी दिवसातून दोनवेळा सराव करतो. अद्याप मी मॅटवर उतरत नाही. पण, सुनियंत्रित राहण्यावर माझा भर आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी मी सहजपणे पात्र ठरु शकेन’, असा विश्वास सुशीलने येथे व्यक्त केला. सुशीलकुमार 74 किलोग्रॅम वजनगटातून लढतो आणि यात भारताला अद्याप एकही ऑलिम्पिक कोटा मिळवता आलेला नाही. ही कसर सुशीलकुमार भरुन काढू शकणार का, याकडे लक्ष्य असणार आहे.
‘2011 मध्येही माझ्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. पण, त्यावेळी मी टीकाकारांना माझ्या कामगिरीच्या माध्यमातून उत्तर दिले होते. आता देखील टोकियो ऑलिम्पिकमध्ये माझा असाच प्रयत्न असेल, आणखी सरस कामगिरी साकारणे, हे माझे लक्ष्य असेल आणि त्या दृष्टीने माझी तयारी सुरु आहे’, असे सुशील एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाला.
2011 मध्ये सुशीलच्या फॉर्मविषयी अनेक प्रश्नचिन्ह होते. बीजिंग ऑलिम्पिक कांस्यपदकाची तो पुनरावृत्ती करु शकणार का, यावर त्याच्या टीकाकारांचा आक्षेप होता. पण, प्रत्यक्षात लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने रौप्यपदकाची रुपेरी कमाई करत टीकाकारांचा चोख समाचार घेतला होता.
सुशीलचा जुना प्रतिस्पर्धी नरसिंग यादवही पुन्हा रिंगणात
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाच्या कालावधीने लांबणीवर टाकली गेल्याने सुशीलचा जुना प्रतिस्पर्धी नरसिंग यादव हा देखील पुन्हा रिंगणात येईल, हे जवळपास निश्चित मानले जाते. नरसिंग यादवचे चार वर्षांचे निलंबन यंदा जुलैमध्ये पूर्ण होईल आणि यामुळे तो देखील ऑलिम्पिक पात्रतेसाठी जोमाने प्रयत्न करु शकतो. नरसिंगला पुनरागमन करण्याची पूर्ण संधी दिली जाईल, असे भारतीय कुस्ती फेडरेशनने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय नव्हे, आंतरराष्ट्रीय मल्लांकडे खरे लक्ष
निवडीसाठी कोणत्या राष्ट्रीय सहकाऱयाकडून अधिक आव्हान असण्याची शक्यता वाटते, या प्रश्नावर सुशीलकुमारने आपण भारतीय सहकाऱयांऐवजी प्रत्यक्ष स्पर्धेत कोणत्या आंतरराष्ट्रीय मल्लांकडून आव्हान असेल, त्याचा अधिक विचार करतो, असे उत्तर दिले. ‘जर छोटा विचार केला तर आपण काहीच साध्य करु शकत नाही, यावर माझा विश्वास आहे. मी फक्त माझे आंतरराष्ट्रीय प्रतिस्पर्धी कोण असतील, त्यावर अधिक लक्ष केंद्रित करतो. उझ्बेकिस्तानचा आशियाई सुवर्णजेता बेक्झोद हा उत्तम मल्ल आहे. त्याच्याविरुद्ध रणनीती काय असावी, याचे विचार माझ्या मनात सुरु आहेत’, असे त्याने येथे नमूद केले.
2016 मधील समीकरणांना उजाळा
यापूर्वी, 2016 मध्ये अनुभवी सुशीलकुमारऐवजी ताज्या दमाच्या नरसिंग यादवला संधी देण्यात आली, त्यावरुन बरेच वादंग रंगले होते. थेट अंतिम निवड न करता चाचणी घेण्याची केलेली मागणी फेडरेशनने फेटाळल्यानंतर त्यामुळे संतप्त झालेल्या सुशीलने त्यावेळी उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले. पण, नंतर उत्तेजक चाचणीत नरसिंग यादव दोषी आढळला आणि यामुळे साऱया समीकरणांची प्रचंड उलथापालथ झाली होती. आता चाचणीत पुन्हा नरसिंगचा सामना करण्याची तयारी आहे का, या प्रश्नावर सुशीलने ती वेळ आल्यावर पाहू, आताच उत्तर देण्याची गरज काय, असा प्रतिप्रश्न केला. नरसिंगलाही आता प्रयत्न करण्याची संधी मिळेल, त्यामुळे त्याला मी शुभेच्छा देतो, असे मात्र तो आवर्जून म्हणाला.