प्रतिनिधी /पणजी
पणजीचे माजी महापौर टोनी रॉड्रिग्स यांच्यासह माजी नगरसेवक दया कारापूरकर, नागेश करीशेट्टी व इतर अनेकांनी काल काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
युतीचा विषय काँग्रेसचे निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम व प्रभारी दिनेनश गुंडूराव हे हाताळत असून येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 25 पेक्षा जास्त जागा मिळणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.
कॉंग्रेसमधून फुटलेल्या 10 जणांना पुन्हा पक्षात स्थान नाही तसेच त्यांना कोणत्याही स्वरूपातील पाठिंबा पक्ष देणार नसल्याचे चोडणकर यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्ष भाजपला हरवून आगामी निवडणुकीत सत्ता मिळवेल असा ठाम विश्वास विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी प्रकट केला.
राजधानी पणजीतील काँग्रेस भवनात हा प्रवेश सोहळा झाला. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप सरकार तसेच पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. भाजपचे कार्यकर्ते त्या पक्षाला, नेत्यांना कंटाळले असून तेच आता त्यांच्या उमेदवारांचा पाडाव करतील असे चोडणकर यांनी नमूद केले. माजी महापौर उदय मडकईकर यांच्या पत्नी लीना मडकईकर व इतर अनेक महिला काँग्रेस पक्षात सामील झाल्या आहेत. टोनी रॉड्रीग्स हे समर्थकांसमवेत काँग्रेस पक्षात आल्याची माहिती चोडणकर यांनी दिली. सर्वांचे पुष्पे देऊन आणि काँग्रेसचे उपरणे गळय़ात घालून काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात आले.
रॉड्रीग्स म्हणाले की ताळगांवातील समस्या तशाच असून त्या सुटलेल्या नाहीत. शेतकऱयांच्या शेतात पाणी जात असल्याने शेती करता येत नाही. त्याचा प्रश्न प्रथम सोडवण्याकडे लक्ष देणार आहे. ताळगावच्या जनतेने आपणास पुढे काढले असून पाठिंबा दिल्याचा दावा श्री. रॉड्रीग्स यांनी केला. भाजप सरकारने गेल्या 10 वर्षात सर्वसामान्य जनतेला भिकेला लावल्याचा आरोप कामत यांनी केला. काँग्रेसचे सरकार सत्तेवर यायला हवे अशी सर्वसामान्य जनतेची इच्छा असल्याचे ते म्हणाले आणि ती इच्छा पूर्ण होणार असल्याचा दावा कामत यांनी केला.