प्रतिनिधी/ बेळगाव
वाढत्या उन्हामुळे भाजीपाल्यांची आवक काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर पुन्हा वाढत चालले आहेत. टोमॅटो वगळता इतर सर्व भाजीपाल्यांचे दर 40 ते 50 रुपये किलो झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या तेलाबरोबर भाजीपाल्यांच्या दरांचाही चटका सहन करावा लागत आहे. भाजीपाल्यांची मागणी वाढली असली तरी टोमॅटो, लालभाजी, पालक, कांदापात वगळता इतर भाजीपाल्यांचा दरात वाढ झाली आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात काकडी 60 रु. किलो, बिन्स 40 रु. किलो, दुधीभोपळा 20 रुपये एक, ढबू 80 रु. किलो, भेंडी 40 रु. किलो, शेवग्याचा शेंगा 20 रु. पेंडी, हिरवा वाटाणा 60 रु. किलो, वांगी 50 रु. किलो, टोमॅटो 15 रु. किलो, गवार 40 रु. किलो, फ्लॉवर 20 रुपयाला एक, गाजर 40 रु. किलो, नवलकोल 10 रुपयाला 4 नग, कारली 60 रु. किलो, ओली मिरची 100 रु. किलो, कोबी 20 रु. एक, दोडकी 60 रु. किलो, कोथिंबीर 15 रु. पेंडी, लालभाजी 10 रुपयाला एक, कांदापात 20 रुपयाला पाच, मेथी 10 रुपयाला एक, पालक 20 रुपयाला चार, कांदे 20 रुपये किलो, बटाटा 30 रु. किलो तर लिंबू 5 रुपयाला एक अशी विक्री सुरु होती.
रशिया-युपेन युद्धामुळे खाद्यतेलांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तेल खरेदी करणे कठीण झाले आहे. किलोमागे तेलाचे दर 10 ते 20 रुपयांनी वाढल्याने ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
लिंबूदरातही वाढ
वाढत्या उन्हामुळे थंड पेयांना मागणी वाढली आहे. त्यामुळे लिंबूच्या दरातही वाढ झाली आहे. लिंबूची आवक असली तरी 5 रुपये एक याप्रमाणे लिंबूची विक्री सुरु आहे.