बेंगळूरमधील मणिपाल इस्पितळात घेतला अखेरचा श्वास
प्रतिनिधी/ बेंगळूर
वाहननिर्मिती क्षेत्रातील उद्योजक आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष विक्रम एस. किर्लोस्कर (वय 64) यांचे मंगळवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यासह राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
मंगळवारी रात्री उशिरा विक्रम किर्लोस्कर यांना बेंगळूरच्या मल्लेश्वरम येथील निवासस्थानी हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांना तातडीने एचएएल विमानतळ रोडवरील मणिपाल इस्पितळात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. टोयोटा इंडिया कंपनीने आपल्या ट्विटर हॅन्डलवर ही माहिती दिली. बेंगळूरच्या हेब्बाळ येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर, मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे.
25 नोव्हेंबर रोजी विक्रम किर्लोस्कर हे मुंबईमध्ये झालेल्या टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या अनावरण कार्यक्रमात सहभागी झाले होते. किर्लोस्कर गुपच्या चौथ्या पिढीतील ते प्रमुख होते. त्यांनी किर्लोस्कर सिस्टम्स लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद सांभाळले होते. नंतर टोयोटा आणि किर्लोस्कर या कंपन्यांच्या भागीदारीतून भारतात वाहननिर्मिती क्षेत्रात नावलौकिक मिळविला.
विक्रम किर्लोस्कर यांनी मॅसॅच्युसेट्स इस्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (एमआयटी) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी संपादन केली. त्यांनी भारतीय वाहन निर्मिती क्षेत्रातील अत्यंत प्रभावी व्यक्तींपैकी एक होते. भारतात टोयोटा कारला लोकप्रिय करण्याचे श्रेय विक्रम यांना जाते.
किरण मुझुमदार भावूक
बायोकॉनच्या कार्यकारी अध्यक्षा किरण मुझुमदार यांनी विक्रम किर्लोस्कर यांच्याविषयी आठवणी जागविल्या. विक्रमच्या निधनाने मी उद्ध्वस्त झाली आहे. तो माझा सच्चा मित्र होता. त्यांची मला खूप आठवण येत राहिल. मी त्यांची पत्नी गीतांजली आणि मुलगी मानसी तसेच कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करते, अशा शब्दात मुझुमदार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.