भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांचा पालकमंत्र्यांवर घणाघात : रिमोटवर चालणारी माणसं यांना पाहिजेत : धनंजय महाडिक यांची टीका
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोल्हापूरकरांनी ज्या विरोधात आंदोलन उभे केले त्या टोलची पावती फाडणाऱ्यांनी महापालिकेसह राज्यात सत्ता असतानाही जिल्ह्यासाठी काय केले? अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर बुधवारी केली. दरम्यान आमदारकी, खासदारकी व पालकमंत्री हे सर्व आपल्यालाच पाहीजे, तसेच आपण म्हणेल ती ऐकणारी म्हणजे रिमोटवर चालणारी माणसं यांना लागतात, अशी टीका पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी पालकमंत्र्यांचे नाव न घेता केली.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी ‘कोल्हापूर उत्तर’चे भाजपचे उमेदवा सत्यजित कदम, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, प्रदेश कार्यकारीणी सदस्य महेश जाधव, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रा. जयंत पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, माजी आमदार अमल महाडिक, माजी महापौर सुनील कदम, माणिक पाटील-चुयेकर, विजय जाधव, मंगलराव माळगे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आ. चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री पाटील यांना बिंदू चौकात येऊन 50 वर्षात काँग्रेसने काय केले व 5 वर्षात भाजपन काय केले? याची खुली चर्चा करु या, असे आव्हाण दिले. कोल्हापूर उत्तरची निवडणूक भाजप ही विकासाच्या मुद्दयावर लढणार आहे. 2019 च्या महापुरावेळी भाजप सरकारने पुरग्रस्तांना दिलेली मदत अजूनही जनतेला आठवतेय. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या माजी खा. राजू शेट्टी यांनीही 2019 च्या शासन निर्णयानुसार पूरग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी केली आहे. यावरुन महाविकास आघाडीचा कारभार काय ते समजत आहे. टोलची पावती फाडणार्या पालकमंत्र्यांनी कोल्हापूरच्या जनतेवर टोल लादला. याचे 473 कोटी रुपये भाजप सरकारने भागवून कोल्हापूरला टोल मुक्त केले. पूर्वी विमानतळाची स्थिती काय होती? हे कोल्हापूरांना माहित आहे. भाजप सरकारच्या काळात कोल्हापूर विमानतळासाठी भरघोस निधी मिळाला. त्यामुळे बेंगलोर, तिरुपती, हैदराबाद विमानसेवा सुरु झाली. तसेच तीर्थक्षेत्रांच्या विस्तारीकरण व सुशोभिकरणासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी दिला. हे प्रमुख मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत चंद्रकांत दादांनी सांगितले.