बिदर गुलबर्ग्याच्या सीमेवर विशेष लक्ष
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना महामारीच्या कठीण काळातच धोकादायक वाळवंटी टोळ्यांच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने कंबर कसली आहे. उत्तर भारतातील पाच राज्यात टोळधाडीमुळे कृषी व्यवसाय अडचणीत आला आहे. ही टोळधाड पूर्व महाराष्ट्रात पोचल्याने सीमावर्ती भागातील शेतकरी चिंतेत सापडले आहेत. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने राज्यातील कृषी अधिकाऱ्यांना या प्राणघातक किटकांची लढा देण्यासाठी आवश्यक तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. लोकस्ट या जातीचे हे टोळ सर्व प्रकारच्या वनस्पती आणि उभ्या पिकांवर हल्ला करून ते फस्त करतात. वाऱ्याच्या दिशेनुसार त्यांचे उड्डाण होत असते. एका दिवसात ते कमाल 200 किलोमीटर अंतर कापू शकतात. हे टोळ सर्व प्रकारच्या वनस्पतींसाठी धोकादायक आहेत. हिरवी पाने खातात. हजारो एकर क्षेत्रात पसरलेली पिके काही क्षणातच फस्त करू शकतात. हे टोळ कीटक महाराष्ट्रातील नागपूर जवळच्या काही गावात सापडले आहेत. हे शहर बिदर पासून चारशे पन्नास किलोमीटर तर गुलबर्ग्या पासून 650 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार खबरदारी घेत आहे. हे टोळ जंगलावर आक्रमण करण्याची शक्यता आहे. त्यासाठी आम्ही वनविभागा सोबत काम करण्याचे नियोजन केले आहे. टोळांशी लढण्यासाठी रसायनांचा पुरेसा साठा आहे, अशी माहिती कृषी आयुक्त ब्रिजेश कुमार दीक्षित यांनी दिली.