ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पाकिस्तानातून आलेली टोळधाड पाऊस सुरू झाल्यावर पुन्हा राजस्थानात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने भारताला पुढील चार आठवडे अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
मागील दोन महिन्यात पाकिस्तानच्या सीमेवरून भारतात आलेल्या टोळधाडीचा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, बिहारसह राजस्थानला सर्वाधिक फटका बसला. आता पाऊस सुरू झाल्यानंतर पुन्हा ही टोळधाड राजस्थानात दाखल होऊ शकते. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने हा इशारा दिल्यानंतर टोळधाडीच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारत सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
मागील आठवड्यात या टोळधाडीने आता दिल्लीकडे मोर्चा वळवला होता. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने दक्षिण आणि उत्तर जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जाहीर केला होता. त्यावेळी संबंधित भागात ड्रम आणि डीजे वाजविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच फटाके लावून कडूनिंबाची पाने पेटवण्याचाही सल्ला दिल्ली सरकारने दिला होता.