कोरोना विषाणूचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यातून आपली मान वर निघण्याच्या आधीच दुसऱया संकटाची चाहूल लागली आहे. गेल्या आठवडय़ात आपल्याकडे टोळधाड आल्याच्या बातम्या आल्या. हे टोळ कोटय़वधीच्या संख्येने येऊन शेते फस्त करतात आणि तसे झाले की पुढच्या हंगामात धान्ये दुर्मिळ, महाग होतील या कल्पनेने अंगावर काटा आला. त्याबरोबर त्यांच्या चित्रफिती आल्या. नंतर त्या बातम्या आपल्याकडच्या नाहीत अशा बातम्या आल्या. ते जाऊ देत. पण चित्रफितीतले ते उडते किडे पाहून मनात अनेक विचार आले. आपण त्यांना पाहून घाबरतो. पण चिनी लोकांनी पाहिले तर त्यांना काय वाटले असेल? पावसाबरोबर गारा पडताना दिसल्यावर आपल्या तोंडाला पाणी सुटते तसे त्यांच्या तोंडाला पाणी सुटले असेल का? समजा कांदा भजी, बटाटा भजी किंवा वडा-पाव असे हवेत तरंगताना दिसले तर आपल्याला जसे वाटेल तसेच चिन्यांना वाटले असेल काय? रात्रीच्या वेळी वटवाघळे उडताना पाहून देखील ओली पार्टी करणाऱया चिन्यांच्या तोंडांना पाणी सुटत असेल.
या टोळांप्रमाणेच पाखरे देखील धान्याची नासाडी करतात. पण त्यांना पळवण्यासाठी शेतकरी शेतात बुजगावणी उभी करतात. टोळ मात्र या बुजगावण्यांना भिणार नाहीत. त्यांच्यासाठी काही वेगळी व्यवस्था करावी लागेल. अट्टल गुन्हेगारांना जिंदा या मुर्दा पकडण्यासाठी पोलीस बक्षीस लावतात तशी टोळांना जिवंत पकडण्यासाठी बक्षिसे लावली आणि त्यांना जिवंत पकडता आले तर हे पकडलेले टोळ चिन्यांना (खाण्यासाठी) निर्यात करता येतील. आपल्याकडे प्राणीमित्र आणि पक्षीमित्र असले तरी कीटकमित्र नसतात. त्यामुळे या निर्यातीला कोणी विरोध करणार नाहीत.
काही लोकांनी सुचवले आहे की या टोळांना मोठा आवाज सहन होत नाही. शेतकऱयांनी मोठय़ा आवाजात गाणी लावली तर ती ऐकून टोळ पळून जातील. आपल्या देशात गाणी आणि ती लावण्यासाठी स्पीकर्सच्या भिंतींची आणि डीजेची उणीव नाही.
विनोद बाजूला ठेवून-टोळधाड अद्याप आपल्याकडे येऊन पोचली नसली तरी येण्याची भीती नक्की आहे. ती आली तर काय करायचे यावर गंभीरपणे विचार करावाच लागेल. आपल्याकडेही काही सीमावर्ती भागात टोळांना रात्रीच्या वेळी पकडून त्यांचा खाद्यात समावेश केला जातो असे म्हणतात.