108 नं. ऍम्ब्युलन्सच्या उशीराने घेतला एक बळी
वार्ताहर / गोकुळ शिरगाव
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र.4 वरील कणेरीवाडी येथील जय हिंद धाब्यासमोर सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास दुचाकीवरून कोल्हापुरकडे निघालेल्या दांपत्यास ट्रकने मागून जोराची धडक दिल्यामुळे पल्लवी गणेश म्हस्के मूळ गाव. बाबुळगाव जिल्हा लातुर सध्या राहणार खेबवडे ता. करवीर येथील ऊसतोड महिला जागीच ठार झाली असून, तिचे पती गणेश मस्के या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी 108 क्रमांकाच्या ऍम्ब्युलन्सला येण्यास उशीर झाल्यामुळे उपचारास विलंब झाला व अति रक्तस्त्रावाने महिलेचा हकनाक बळी गेल्याच्या रोषातून स्थानिक नागरिकांनी चालकाच्या ताब्यातून ॲम्बुलन्स काढून घेतली. पोलिसांच्या मध्यस्थीतून ॲम्बुलन्स परत देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी बाबुळगाव जिल्हा लातुर येथून आलेले ऊस तोडणी मजूर खेबवडे येथे पाल टाकून राहिले असून दोन दिवसांपासून पल्लवी मस्के यांची प्रकृती ठीक नसल्याने कोल्हापूरला दवाखान्यात दाखवण्यासाठी दोघे दाम्पत्य आपली दुचाकी क्रमांक एम एच 24 ए व्ही 41 64 वरून निघाले होते. कणेरीवाडी जवळ आल्यानंतर पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रक क्र. के ए 13 सी 32 59 ने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही महामार्गावर दूर जाऊन पडले याचवेळी गंभीर जखमी झालेल्या पल्लवी यांचा काही वेळानंतर जागीच मृत्यू झाला. अपघात होताच ट्रक चालक वाहन हायवेवर सोडून पळून गेले घटनेची माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलिस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. नागरिक व पोलिसांनी महामार्गाच्या ॲम्बुलन्स मधून जखमीस पुढील उपचारार्थ प्रमिला राजे रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.