जिल्हय़ाच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वोच्च नुकसान भरपाईचा आदेश
प्रतिनिधी/ सातारा
कंटेनर ट्रक चालक-मालक संजय सखाराम पवार, (रा. परखंदी, ता. माण) हे स्वतःचा ट्रक चालवीत मुंबईकडून पुण्याकडे येत असताना जुन्या हायवेवर विरुध्द दिशेने आलेल्या दुसऱया ट्रकचा टायर फुटून नियंत्रण जाऊन समोरुन जोराची धडक दिल्याने संजय यांचा जागीच मृत्यु झाला होता. सातारा जिल्हा न्यायालयाने नुकताच निर्णय देवून संजय यांच्या वारसांना समोरच्या ट्रकच्या मालकाकडून व विमा कंपनी कडून रुपये 81 लाख अधिक 7 टक्के दराने व्याज अशी एकूण रुपये 1 कोटी 15 लाख इतकी सातारा जिल्हयाच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वोच्च नुकसान भरपाई देण्याचा आदेश नुकताच दिला आहे.
या क्लेमसंदर्भातील खटल्याची हकीकत अशी, कंटेनर ट्रक चालक-मालक संजय सखाराम पवार, रा. परखंदी, ता. माण हे स्वतःचा ट्रक चालवीत मुंबईकडून पुण्याकडे येत असताना जुन्या हायवेवर विरुध्द दिशेने आलेल्या दुसऱया ट्रकचा टायर फुटून नियंत्रण जाऊन समोरुन जोराची धडक दिल्याने संजय यांचा जागीच मृत्यु झाला होता. सदर अपघाती मृत्यूबद्दल नुकसान भरपाई मिळावी यासाठी संजय यांची पत्नी, तीन मुले व आई यांनी सातारा कोर्टात क्लेम दाखल केला होता.
सातारा जिल्हा न्यायालयाने नुकताच निर्णय देवून संजय यांच्या वारसांना समोरच्या ट्रकच्या मालकाकडून व विमा कंपनी कडून रुपये 81 लाख अधिक 7 टक्के दराने व्याज अशी एकूण रुपये 1 कोटी 15 लाख इतकी नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिलाय. मृत संजय यांच्या वारसांतर्फे सदर नुकसान भरपाईचे दाव्याचे काम पाहिलेले ऍड. राजेंद्र वीर यांनी सांगितले की, संजय यांनी सन 2008 साली 10 चाकी कंटेनर टूक फायनान्स कंपनीच्या कर्जाने विकत घेतला होता. सदर अपघात होईपर्यंत संजय यांनी दरमहा 35 हजार रुपये इतका हप्ता वेळच्या वेळी फेडला होता. तसेच सदर संजय यांचे कुटूंब कळंबोली, मुंबई येथे भाडयाच्या घरात राहत होते व संजय यांची मुले तेथेच शिक्षण घेत होती. या सर्व बाबींचा विचार करून संजय यांचे उत्पन्न दरमहा रुपये 66 हजार इतके होत असल्याने एकूण रुपये 1 कोटी 44 लाख नुकसान भरपाई मिळण्याची मागणी अर्जदारां तर्फे करण्यात आली होती.
सदर क्लेमच्या कामी सदर कंटेनर ट्रकच्या कर्ज खात्याचा उतारा ट्रकच्या मालकीचे आर टी.ओ. चे दाखले इत्यादी कागदपत्रे दाखल करण्यात आली होती. सदर पुरावा व सर्वोच्च न्यायालयाचे व मुंबई उच्च न्यायालयाचे विविध न्यायनिर्णय याचा विचार करून सातारा येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश पी. पी. अभंग यांनी अंतिम निर्णय देवून नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.