सरकारशी साटेलोटे असल्याचा राणेंचा आरोप
वार्ताहर / कणकवली:
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱया चाकरमान्यांनी ई पाससाठी अर्ज केला तर तो रिजेक्ट होते. मात्र, ट्रव्हल्स एजन्सींकडून ई पास मिळतात. त्यामुळे सरकार व ट्रव्हल्स एजन्सींचे साटेलोटे असण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराला चालना देण्यासाठी सरकार एसटी सुरू करण्यास टाळाटाळ करत आहे. मुख्यमंत्र्यांना कोकणवासीयांसाठी निर्णय घेण्यास वेळ नाही का? सरकारला हप्ते पोहोचल्यानंतर एसटी सुरू करण्याचा निर्णय घेणार का, असा सवाल भाजप आमदार नीतेश राणे यांनी केला आहे.
राणे म्हणाले, गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात गावी येण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेनेला कोकणने भरभरून दिले, त्या शिवसेनेचे मंत्री, आमदार असूनही कोकणवासीयांना गावी जाण्यासाठी सरकार एसटी सेवा सुरू करू शकले नाही. सर्वसामान्यांचे ई पास नाकारले जातात. मात्र ट्रव्हल्स कंपनीला दोन तासात ई पास मिळतो.
सरकारच्या आशीर्वादाने चालले आहे का?
राणे म्हणाले, शिवसेनेचे बहुतेक आमदार, मंत्री कोकणातील आहेत. सरकारने एस. टी. सुरू करण्यास उशिर केल्याने खासगी ट्रव्हल्स एजंटकडून गावी जाण्यासाठी चाकरमान्यांकडून पैसे उकळले जातात. खासगी ट्रव्हल्सचे भाडे ई – पाससह आकारण्यात येते. हे कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. खासगी ट्रव्हल्स आकारत असलेले भाडे दहा हजाराच्या खाली नाही. त्यामुळे हे सर्व सरकारच्या आशीर्वादानेच चालले आहे का? कोकणात जाण्यासाठी ई – पासच्या रॅकेटबाबत मी लक्ष वेधल्यानंतर कारवाई करण्यात आली. सिंधुदुर्गात आज मोठय़ा प्रमाणात चाकरमानी गावी गेले आहेत. खासगी ट्रव्हल्सच्या माध्यमातून चाकरमानी आता गावी पोहोचले की नंतर एस. टी. मधून जाणार कोण?
टेस्ट करून गावी पाठवा!
राणे म्हणाले, चाकरमान्यांची मोफत कोविड टेस्ट करून त्यांना 48 तासातच गावात पाठवले की, गावात जाताना क्वारंटाईन करण्याची गरज नाही. यामुळे प्रशासन व आरोग्य विभागावर ताण येणार नाही. गोवा राज्य गेले तीन महिने अशाप्रकारे टेस्ट करत आहे. जो पॉझिटिव्ह येईल त्याला उपचारासाठी पाठविता येईल. यासाठी सरपंच सरकारला मदत करण्याच्या भूमिकेत आहेत.
नियोजनशून्य कारभारामुळे चाकरमानी अडचणीत!
गणेशोत्सवाच्या नियोजनाबाबत मंत्रालयात बैठका होतात. मात्र, निर्णय होत नाहीत. नियोजनशून्य कारभारामुळे चाकरमानी अडचणीत आले आहेत. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी मुंबईत घेण्यात आलेली बैठक शिवसेनेच्या शाखेत घेतली तर चांगले झाले असते. त्या बैठकीला शिवसेनेचे आमदार, मंत्री उपस्थित होते, असेही राणे यांनी म्हटले आहे.
चाकरमान्यांना यावर्षीही पाठविणार!
एका बाजूला सरकार वेळ काढतेय व ट्रव्हल्स एजन्सीला 15 ते 20 हजार द्यावे लागतात. मग सरकार काय कामाचे? याबाबत निर्णय झाला नाही तर आम्ही योग्य ती भूमिका घेणार. गेले सात वर्षे मी खासगी ट्रव्हल्सच्या माध्यमातून गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना गावी पाठवतो. त्याप्रमाणे यावर्षीही चाकरमान्यांची ‘कोरोना’ टेस्ट करून पाठविणार, असे राणे यांनी सांगितले.