प्रतिनिधी / आटपाडी
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडकलेले चाकरमानी, कामगार आता पुन्हा मुंबईकडे कामासाठी निघाले आहेत. अशा मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांकडुन प्रति मानसी तब्बल दोन हजार रूपयांचा दर आकारण्याचा उद्योग खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी आटपाडी तालुक्यात सुरू केला आहे. त्यांच्या या लुटीविरोधात भाजपा युवा मोर्चाने आक्रमक पवित्रा घेत आर्थिक पिळवणुक थांबविण्याची मागणी केली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बिरूदेव खांडेकर, भिंगेवाडीचे सरपंच बाळासाहेब हजारे, दादासाहेब जानकर, बापुसाहेब देशमुख, जगन्नाथ खटके, रणजित लेंगरे, आप्पासाहेब तळे, लहु मेटकरी, वैभव माळी, विकास पाटील, बंडु शिंदे, भोजलिंग गावडे, दत्ता कोळेकर आदिनी खासगी ट्रॅव्हल्स वाल्यांच्या लुटीविरोधात तहसीलदार, पोलीस निरीक्षकांना निवेदन या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले.
आटपाडी तालुक्यातील हजारो लोक मुंबई व परिसरात गोदीसह अन्य कामावर आहेत. लाकडाऊनमध्ये हे लोक गावी आले. आता पुन्हा लॉकडाऊन शिथील झाल्याने कामावर जावे लागत आहे. नोकरी, व्यवसायासाठी मुंबईकडे जाण्यासाठी आनेकांनी खाजगी ट्रॅव्हल्सचा आधार घेण्यास प्रारंभ केला आहे. परंतु कोरोनाच्या संकट कालावधीत लुटीचा उद्योग खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे मुळ भाड्यापेक्षा चारपट भाडे आकारण्यास सुरुवात झाली आहे. पुर्वी ट्रॅव्हल्सने ५००रूपयात मुंबईला जाता येत होते. पण, आत्ता ट्रॅव्हल्सवाल्यांनी तब्बल दोन ते अडीच हजार रूपये दर करून लुटीचेच धोरण अवलंबले आहे. मुळात कोरोनाने संकटात सापडलेले लोक जगण्यासाठी पुन्हा जीव धोक्यात घालत मुंबईकडे निघाले आहेत. त्यांची लुट करण्याचा हा प्रकार गंभीर असुन हा अन्याय खपवून घेणार नसल्याचा इशारा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बिरूदेव खांडेकर व सहकाऱ्यांनी दिला.
आटपाडी तालक्यातील मंबाईकर लोकांच्या जीवावरच आजपर्यंत खासगी ट्रॅव्हत्सवाले गोठे झाले. पण आत्ता संकटातील लोकांना पुन्हा लुट करून संकटात टाकण्याचा प्रकार सुरू आहे. अशा जादा दराने होणारी ट्रॅव्हल्सची वाहतुक होवु देणार नाही, अशा इशाराही दत्ता कोळेकर, अशोक ढोण, दिगंबर मरगळे, बिरा दाईंगडे, समाधान लेंगरे, रामभाऊ पाटील, नितीन मरगळे, शशिकांत खांडेकर, रावसाहेब अनुसे, आशिक शेख, चंद्रकांत कोळेकर, नवनाथ लेंगरे, बापु हजारे, आनंद लेंगरे, अशोक लेंगरे, विष्णु लाडे आदिनी दिला.
मुंबईला जाणाऱ्या गावाकडील मंडळींनी अशा जादा दराने वाहतुक होणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समधुन प्रवास करू नये. खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी ही अन्यायी लुट न थांबविल्यास या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही, अशा सज्जड इशारा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. आटपाडी तहसीलदार, पोलीसांसह सांगली जिल्हा आरटीओंनी याप्रश्नी लक्ष घालून खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडुन सुरू असणारी लुट थांबावावी, अशी मागणी करण्यात आली आहे.