जोधपूर / वृत्तसंस्था
राजस्थानमधील बारमेर जिह्यात बुधवारी बस आणि टेलरची भीषण धडक झाली. भंडियावास गावातील संस्कार शाळेजवळ बस आणि टेलरची समोरासमोर धडक बसल्यानंतर दोन्ही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या दुर्घटनेत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली. जोधपूर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी 10.30 वाजता हा अपघात घडला. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासोबतच जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पोलीस आणि प्रशासनाला मदतकार्यासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत.
बालोत्राहून जोधपूरला जाणाऱया बसमध्ये 35-40 प्रवासी प्रवास करत होते. याचदरम्यान विरुद्ध दिशेने आलेला टेलर महामार्गावर बसवर धडकला. त्यानंतर काही मिनिटातच वाहनांनी पेट घेतला. सुरुवातीला 5 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु नंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एका मुलीसह एकंदर 12 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या अपघातातील 40 जखमींना जवळच्या नाहाटा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर गंभीर जखमी झालेल्या 13 जणांना जोधपूरला हलविण्यात आले आहे.
वाहनांना लागलेली आग भीषण असल्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. पाचपदरा, बालोत्रा आणि रिफायनरीचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या तीन बंबांनी अर्ध्या तासात दोन्ही गाडय़ांची आग आटोक्मयात आणली. घटनेची माहिती मिळताच पाचपदरा पोलीस अधिकारी प्रदीप डांगा, एसपी दीपक भार्गव आणि जिल्हाधिकारी लोकबंधू हे घटनास्थळी पोहोचले. तसेच विभागीय आयुक्त डॉ. राजेश शर्मा, मंत्री सुखराम विश्नोई, आमदार मदन प्रजापत यांनीही घटनास्थळी धाव घेत आढावा घेतला.