कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांचा निर्वाणीचा इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
खलिस्तानवाद्यांच्या प्रक्षोभक ट्विटर हँडल्सवर बंदी घालावी अशी सूचना केंद्र सरकारने ट्विटर कंपनीला केली आहे. साधारणतः 2 हजार ट्विटर हँडल्सची माहितीही कंपनीला देण्यात आली होती. मात्र, ट्विटरने केवळ तोंडदेखली कारवाई केली आहे. परिणामी सरकारी आदेशाचा भंग केल्याच्या आरोपाखाली ट्विटरच्या भारतातील अधिकाऱयांना अटक केली जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती संसदेत दिली. हजारो खलिस्तावादी ट्विटर हँडल्स निर्माण करण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून भारतात शेतकऱयांचे शिरकाण सुरू असल्याचे धादांत खोटे संदेश पसरविण्यात येत आहेत. भारताच्या सार्वभौमत्वाला धोका पोहचविणे आणि भारतात राजकीय अस्थैर्य निर्माण करणे या हेतूने हे संदेश पसरविण्यात येत आहेत. ट्विटरला यापूर्वीच ही माहिती देण्यात आली असून कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. तथापि, ट्विटरची कारवाई अगदीच सौम्य आहे. त्यामुळे या कंपनीवर लवकरच कारवाई होणार असल्याचे प्रसाद यांनी गुरूवारी राज्यसभेत स्पष्ट केले.
पक्षपाती धोरण गेल्या महिन्यात अमेरिकेच्या कॅपिटॉल हिल येथे जमावाने हिंसाचार केला होता. त्यावेळी ट्विटरने असंख्य हँडल्स बंद करून कठोर कारवाई केली होती. तथापि गणतंत्रदिनी शेतकरी आंदोलनातील अनेक लोकांनी लाल किल्ल्यात घुसून राष्ट्रध्वजाचा अवमान केला होता. त्यावेळी मात्र ट्विटरने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दिखाऊ कारण दाखवत अशा कारवाईला नकार दिला होता. हा पक्षपात समोर आल्याने आता या कंपनीच्या अधिकाऱयांवर कारवाई होणे अटळ आहे. सरकार या अधिकाऱयांना सैल सोडणार नाही, असे आश्वासन प्रसाद यांनी दिले.