इज्जत वाचवण्यासाठी सरकारने माझ्यावरची बंदी उठवली – किरीट सोमय्या
प्रतिनिधी/उंब्रज
ठाकरे-पवार हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात माझी लढाई आहे यासाठी शक्तीचे दैवत असणाऱ्या अंबामातेने मला शक्ती द्यावी म्हणून प्रार्थना करण्यासाठी कोल्हापूरला चाललो आहे. कोणत्याही परिस्थितीची परवा नाही मात्र घोटाळेबाजांना बंद करणे हे माझे कर्तव्य आहे. तसे इज्जत वाचवण्यासाठी सरकारने माझ्यावरची बंदी उठवल्याचा घणाघात किरीट सोमय्या यांनी केला.
कोल्हापूरला जात असताना मंगळवारी सकाळी उंब्रज ता.कराड येथे किरीट सोमय्या यांचे आगमन झाल्यानंतर उंब्रज येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, अंबामातेचा आशीर्वाद घेण्यासाठी कोल्हापूरला निघालो आहे. घोटाळे बाजांना बंद करण्यासाठी मी जो लढा उभारला आहे त्यासाठी मला शक्ती द्यावी ही प्रार्थना करण्यासाठी मी चाललो आहे. सरकारच्या बंदीला कोणीही भीक घालत नाही. मी तर त्यांना चॅलेंज केले आहे की ठाकरे-पवार यांनी हिंमत असेल तर मला अडवून दाखवावे. हे त्यांच्या लक्षात आले आहे. जनता किरीट सोमय्याच्या मागे आहे. काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढले. मात्र या परिस्थितीची परवाना नाही. घोटाळेबाजांना बंद करणे हे माझे कर्तव्य आहे. असे किरीट सोमय्या यांनी बोलताना सांगितले.
दरम्यान भारतीय जनता पार्टी कराड उत्तरच्या वतीने उंब्रज येथे घोषणाबाजी करत सोमय्या यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.