प्रतिनिधी/ पणजी
पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेस जबाबदार धरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच त्यांचे सुपूत्र असलेले युवा सेनाध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या प्रतिमांचे दहन करण्याच्या गोवा भाजपच्या कृत्याचा गोवा शिवसेनेने जोरदार निषेध व्यक्त केला आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत गोवा शिवसेना प्रमुख जितेश कामत आणि अन्य पदाधिकाऱयांनी हा निषेध व्यक्त केल आहे. हे कृत्य केवळ युवा भाजपनेच केले असते तर त्यांचा तो बालिशपणा मानून आम्ही गप्प राहिलो असतो. परंतु त्यावेळी भाजप ज्येष्ठ नेते माजी आमदार दामोदर नाईक हेही त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. कायद्याचे पालन करणाऱयांच्या प्रतिमांचे दहन करणे ही मोठी चूक असून आम्हाला ते कदापी मान्य नाही, असे कामत म्हणाले.
अन्वय नाईक या आर्किटेक्टच्या आत्महत्या प्रकरणी गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. आपल्या पतीच्या आत्महत्येस न्याय द्यावा, अशी मागणी करत नाईक यांची पत्नी व कन्येने पंतप्रधान व रायगड पोलीस प्रमुखांना पत्रे लिहिली होती. त्यानुसारच ही कारवाई झालेली आहे. याच प्रकरणात फिरोज शेख व नितीश सर्डा यांच्याही अटकेचे आदेश दिले आहेत, असे कामत यांनी सांगितले.
या सर्व गोष्टी कायद्याच्या चौकटीत होत असतानाही गोवा भाजपतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचे दहन करणे हे पूर्ण चुकीचे आहे. तरुण तेजपाल हे सुद्धा पत्रकारच होते आणि त्यांना गोव्यात भाजपचे सरकार असतानाच अटक झाली होती, त्यावेळी कुणाच्या प्रतिमेचे दहन का करण्यात आले नाही. आता गोस्वामी हे भाजपचे माऊथपीस आहेत म्हणून त्यांच्या अटकेचा निषेध करतात का? गोस्वामीमुळे ज्यांच्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळू नये, असे भाजपला वाटते का? असे सवाल कामत यांनी उपस्थित केले.
गोस्वामींच्या अटकेचा निषेध करून भाजपने आपले अज्ञान दर्शविले आहे. कोणतीही पूर्ण माहिती न मिळविताच अशाप्रकारची कृती करणे हे अज्ञानपणाचेच लक्षण आहे. भाजपला युवा पिढीची एवढीच कळकळ असेल तर स्थानिक युवकांचे कोणतेही प्रश्न घेऊन ते पुढे येताना दिसत नाहीत. गोव्यात आज ड्रग्जचा सुळसुळाट झालेला आहे, सनबर्नसारख्या पाटर्य़ा होत आहेत, सामाजिक विषय घेऊन लढा देणाऱयांवर हल्ले होत आहेत, हत्या होत आहेत, असे कितीतरी स्थानिक प्रश्न असताना कोणताही आवाज न उठवणारे भाजप युवा मोर्चा महाराष्ट्रातील विषयासाठी मात्र तत्परतेने पुढे येत पुतळ्याचे दहन करतात, हे लांछनास्पद आहे, असे कामत यांनी नमूद केले.