ऑनलाईन टीम / नागपूर :
ठाकरे सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी मिळत आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश आज काढण्यात आले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल असे जाहीर केले होते. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने पत्र पाठवून मदत वाटपाबद्दलच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी जो 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केेले आहे, त्यापैकी आज 2 हजार 289 कोटी वितरित करण्यात आले आहेत. हा सर्व निधी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान यासाठीच द्यावा अशी सूचना दिली आहे, असे मदन आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले, दिवाळीआधी आज 2 हजार 289 कोटी देत असलो तरी दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीचे उर्वरित पैसे देऊ. संपूर्ण नुकसानभरपाई दिवाळी आधी देण्याची आमची तयारी होती, मात्र अचानक निवडणूक जाहीर झाली, त्यामुळे काही अडचण निर्माण झाली. मात्र, आम्ही निवडणूक आयोगाची विशेष परवानगी मागून ही मदत देत आहोत.
पुढे ते म्हणाले, काल काही बातम्यांमध्ये विदर्भाच्या वाट्याला अवघे 8 कोटी असा उल्लेख होता, त्यात तथ्य नाही. उलट विदर्भाला 566 कोटींचा निधी देणार आहोत, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान संदर्भात एकूण 4 हजार 700 कोटी देणार आहोत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.