मुंबई / ऑनलाईन टीम
देशभरासह महाराष्ट्रात देखील कोरोनाचा प्रसार वाढत आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या प्रसारावरून भाजपने सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘ठाकरे सरकारची पोरं हुश्शार, हट्टाने कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावला आहे’, असे ट्वीट करत भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सध्या भाजपचे हे ट्वीट चांगलेच चर्चेत आहे.
महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून हे ट्वीट करण्यात आले आहे. ट्वीटमध्ये एक आकडेवारीचा फोटो शेअर करत म्हटले आहे की, ‘देशातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ७२ टक्क्यांचा वाटा उचलून ठाकरे सरकारने महाराष्ट्रावर नामुष्की आणली आहे. कोरोनाची दुसरी लाट येत असल्याचा इशारा केंद्रानं दिल्यावरही ठाकरे सरकारनं त्याच्याकडे दुर्लक्ष करून हट्टानं हा कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावलाय’.
मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रूग्णांचा आकडा वाढत आहे
एकीकडे पालिकेकडून देखील कोरोना रुग्णांचा आकडा कमी व्हावा यासाठी विविध उपाय योजना केल्या जात आहेत. तरी देखील नागरिकांकडून नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. त्यातच शुक्रवारी आतापर्यंतची सर्वाधिक दैनंदिन कोरोना रुग्णवाढीची नोंद झाली. शुक्रवारी 3,062 नवे रुग्ण आढळून आले. तर 10 जणांचा मृत्यू झाला. यापूर्वी 8 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबईत सर्वाधिक 2,848 रुग्णांची नोंद झाली होती. तर एकूण रुग्णांचा आकडा 3,55,879 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत 11,565 जणांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत 20,140 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एकूण 3,23,281 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.