प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणासाठी आग्रही आणि आक्रमक भूमिका घेत राज्यव्यापी दौरा करून राज्य सरकारला अल्टिमेटम देणाऱया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी गौफ्यस्फोट केला आहे. ठाकरे सरकार आपल्यावर हेरगिरी करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी सोमवारी केला. राज्यव्यापी दौऱयात आपण ज्या ठिकाणी बैठका घेतल्या, संवाद साधला, त्या ठिकाणी साध्यावेषातील पोलीस माझ्यावर पाळत ठेवत होते, असे ट्व्टि त्यांनी केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवून काय साध्य होणार आहे? असा सवालही संभाजीराजे यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 5 मे रोजी मराठा आरक्षण कायदा रद्द केल्याचा निर्णय दिला. त्यानंतर राज्यभरातील मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाविरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजप यांच्या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. त्यातून राजकीय कुरघोडीसही प्रारंभ झाला. तापलेल्या वातावरणात खासदार संभाजीराजे यांनी कणखर भूमिका घेत राज्यव्यापी दौरा सुरू केला. राज्यातील मराठा समाजातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तज्ञ आणि विचारवंत यांच्याशी संवाद सुरू केला. त्याबरोबर त्यांनी राजकीय नेत्यांच्या गाठी भेटीची मोहीम राबविताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधून मराठा समाजातील स्थिती, भावना मांडल्या, आरक्षणासंदर्भात चर्चा केली. याचबरोबर मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांच्यासह मराठा समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱयांशी संवाद साधला. 28 मे रोजी संभाजीराजे यांनी राज्य सरकारला तीन पर्याय आणि इतर मागण्या सादर करत 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला. राज्य सरकारने 6 जून पर्यंत निर्णय घेतला नाही तर कोरोना बिरोना विसरून राज्यभर आंदोलनाचाही इशारा दिला.
आरोपानंतर राज्यभरात खळबळ
शुक्रवारी संभाजीराजे यांनी भूमिका जाहीर करत अल्टिमेटम दिल्यानंतर त्यांनी शनिवारी अŸड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. रविवारी ते कोल्हापूरला आले. सोमवारी सिंधुदुर्गात गेल्यानंतर त्यांनी दुपारी ट्व्टिव्दारे आपल्यावर हेरगिरी सुरू असल्याचा गौफ्यस्फोट केला. त्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली असून चर्चेला सुरूवात झाली आहे. राज्याव्यापी दौऱयात मी ज्या ठिकाणी जात होतो, कार्यकर्त्यांशी संवाद साधत होतो, त्या ठिकाणी साध्यावेषातील पोलीस उपस्थित असत. प्रारंभी मी दुर्लक्ष केले, पण नंतर प्रत्येक ठिकाणी पोलीस उपस्थित राहत असल्याचे दिसले. माझ्या सारख्या साध्या कार्यकर्त्याची हेरगिरी करून काय साध्य होणार आहे? असा सवालही संभाजीराजे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, संभाजीराजे यांच्या गंभीर आरोपानंतर राज्य सरकारकडून कोणती प्रतिक्रिया येते, याकडे साऱयांचे लक्ष लागले आहे.
ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी काय म्हटले आहे?
सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे.
माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही.
पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱया एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?
गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याकडून संपर्क
संभाजीराजे यांच्या ट्विटची दखल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी तातडीने घेतली. त्यांनी संभाजीराजे यांच्याशी संपर्क साधला. एका जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमुख अधिकाऱयांशी चर्चा करत असताना अँटीचेंबरच्या दरवाज्या लगत काही साध्या वेषातील पोलीस अधिकारी सर्व संभाषण ऐकण्याचा प्रयत्न करत होते. ही घटना संभाजीराजे यांनी गृहमंत्री वळसे-पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. या घटनेनंतरच आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचे ट्व्टि केल्याचे संभाजीराजे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. तसेच पोलिस सुरक्षेच्या दृष्टीने चेंबरमध्ये आले असावेत, असे वळसे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे मीही त्यांच्या स्पष्टीकरणावर समाधानी असून हा विषय संपला आहे, अशा आशयाची पोस्ट संभाजीराजे यांनी फेसबुक पेजवर केली आहे.