प्रतिनिधी / सातारा :
ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून, शेतकऱ्यांची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश्वासने व घोषणांचा पाऊस पाडून एकही घोषणा कृतीत न आणणाऱ्या ठाकरे सरकारने आमच्या प्रश्नांची जाहीर उत्तरे द्यावीत अन्यथा जनतेची व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
काळे म्हणाले, राज्यातील 55 लाख हेक्टरहून अधिक शेतजमिनींवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याची सरकारची प्राथमिक आकडेवारी आहे. प्रत्यक्षात 100 लाख हेक्टरहून अधिक जमिनीवरील पीके पूर्ण नष्ट झाली आहेत. पुरामुळे शेतजमीनी नापीक झाल्या आहेत. जमीनींचा कस संपल्यामुळे पुढील दहा वर्षे तरी कोणत्याही पिकाची शाश्वती राहिलेली नाही. ठाकरे सरकार हेक्टरी दहा हजार रुपयांच्या फसव्या मदतीची पाने पुसून शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. जाहीर केलेल्या मदतीपैकी फुटकी कवडी देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नसल्याने राज्यातील शेतकरी नैराश्यग्रस्त झाला असून, आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने ठाकरे सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे बळी घेणारे सरकार ठरले आहे. या दुःखामुळे हजारो शेतकरी कुटुंबांची दिवाळी अंधारात जाणार असून, मातोश्री, वर्षा आणि मंत्रालय मात्र रोषणाईने उजळणार आहे. ठाकरे सरकारला जरादेखील लाज असेल, तर यंदाची दिवाळी शेतकऱ्यांच्या दुःखाची दिवाळी म्हणून जाहीर करून मातोश्री व वर्षावर रोषणाई न करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे.
लखीमपूरच्या घटनेनंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोक व्यक्त करून महाराष्ट्र बंदला पाठिंबा देणाऱ्या महाविकास आघाडीला राज्यातअतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या आणि नैराश्यातून आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी द्वेष का? संकटग्रस्त शेतकऱ्यास सहानुभूती दाखविणारा एक शब्दही मंत्रीमंडळाच्या बैठकीत का काढला जात नाही? असा सवालही त्यांनी केला.
यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, किसान मोर्चा प्रदेश चिटणीस रामकृष्ण वेताळ, जिल्हाध्यक्ष रामदास शिंदे, जिल्हा सरचिटणीस शंकर दडस, जिल्हा चिटणीस कोंडीबा आंबटकर ,सातारा तालुका अध्यक्ष हेमंत शिंदे आदी उपस्थित होते.