ऑनलाईन टीम / मुंबई :
ठाकरे सरकार विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेच्या वतीने शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता ‘हॉर्न वाजवा’ आंदोलन करणार आहे.
देशात कोरोना संकट उभे आहे. त्यामुळे वाहतूक व्यवसायातील अडचणी वाढल्या आहेत. लॉक डाऊन मुळे गेल्या अडीच महिन्यापासून रिक्षा, बस, टेम्पो, ट्रक वाहतूक बंद आहेत. या व्यवसायावर ज्यांचे पोट आहे, त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या या समस्या सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी मनसेकडून ‘हॉर्न वाजवा’ आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी सांगितले की, 12 जून रोजी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या हॉर्न वाजवा आंदोलनात राज्यातील सर्व वाहतूनक संघटना सहभागी होणार आहेत. यामध्येटॅक्सी, ट्रक, बस, टेम्पो, लक्झरी वाहने स्टँडवर एकत्र येऊन एक मिनिट हॉर्ननाद करतील.
या आंदोलनात मोठ्या संख्येने वाहनचालक आणि मालकांनी सहभागी व्हावे तसेच आंदोलन करताना सर्वांनी #MNSHornOkPlease हा हॅशटॅग वापरून, हे आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहनही नाईक यांनी यावेळी केले आहे.