ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे. तसेच राज्यात मध्यावधी निवडणुकांसाठी मदत न केल्यास तरुंगात पाठविण्याची धमकी देण्यात आल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.
संजय राऊत यांनी या पत्रात म्हटले आहे की, एक महिन्यापूर्वी मला काही लोक भेटले. त्यांनी राज्यातील महविकास आघाडी सरकार पाडण्यात मदत करा, अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल. माजी रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासारखं तुरुंगात जावं लागेल, अशी धमकी त्या लोकांनी दिली. तसेच राज्यातील कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि दोन मोठय़ा नेत्यांना अटक होणार असल्याने राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार, असं भाकीत त्यांनी वर्तवलं होतं.
दरम्यान, मी अशा कोणत्याही प्रकारच्या गुप्त अजेंडय़ाचा भाग होण्यास नकार दिल्यानंतर तुम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, अशी धमकीही मला देण्यात आली. आता ईडीने माझ्या कुटुंबीयांसह निकटवर्तीयांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. माझ्या मुलीच्या लग्नात काम देण्यात आलेल्या वेंडर्सना त्रास देण्याचं काम ईडीकडून सुरू आहे. लेकीच्या लग्नात डेकोरेशनचं काम केलेल्या लोकांना 50 लाख रुपये देण्यात आल्याचं वदवून घेण्याचा ईडीचा प्रयत्न आहे. पीएमएलए प्रकरणात मला फसवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी हे आता काही राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, असेही राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.