पुणे / प्रतिनिधी :
मंत्रिमंडळाचा विस्तार झाला याचा आम्हाला आनंद आहे, आम्ही विरोधाला विरोध करणारे नाही, राज्यातील अडचणी सुटाव्यात म्हणून आम्ही विस्तार करा, असे म्हणत होतो, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच सरकार पाडण्यासाठी बाहेरुन कोणी काही करण्याची गरज नाही असा टोला देखील पाटील यांनी ठाकरे सरकारला यावेळी लगावला.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले, या सरकारला खाली खेचण्याचा भाजपचा कोणताही प्रयत्न नाही. आम्ही प्रबळ विरोधीपक्ष म्हणून काम करणार आहोत. हे सरकार पाडण्यासाठी बाहेरुन कोणी काही करण्याची गरजच नाही. त्यामुळे ऑपरेशन लोटसच्या सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात प्रामाणिकपणाचे राजकारण व्हायचे. यावेळी काय झाले माहीत नाही. जसे अवकाळी पाऊस, गारपीट अनाकलनीय आहे. तसेच हे राजकारणही अनाकलनीय असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
…तेव्हा चित्र उलट असेल
जनतेला दूध का दूध, पानी का पानी हे कळले आहे. त्यामुळेच निवडून आलेल्या सदस्यांची मोट बांधून आमच्याविरुद्ध जिल्हा परिषद निवडणुका आघाडीतील पक्ष लढत आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषद तशीच जिंकली, मात्र, नव्याने जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा चित्र उलट असेल. जनता आता भाबडेपणाने नव्हे तर सतर्कतेने मतदान करेल. सध्या राजकारणातील संतुलन बिघडले असले तरीही लोकांचा राजकारणावरचा विश्वास उडणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.