नवी दिल्ली / मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण करणार असून त्यामुळे मुंबईकरांची गैरसोयीतून सुटका होणार आहे. आज 4.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या मार्गाचे लोकार्पण करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार असून त्यानंतर त्यांचे भाषणही होणार आहे. दुपारी 4.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ठाणे आणि दिवा यांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग पंतप्रधान मोदी राष्ट्राला समर्पित आहेत. असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
या रेल्वेमार्गाच्या उद्घाटनासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित करणार असून आगामी काळात मुंबईसह राज्यातील अनेक महानगर पालिकांची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर मोदी आपल्या भाषणात महाराष्ट्रासाठी काय़ घोषणा करणार आहेत हे पाहणे देखील महत्वाचे आहे.
कल्याण ते सीएसटीएम दरम्यानच्या चार रेल्वे मार्गांपैकी दोन मार्ग धीम्या लोकलसाठी आणि दोन मार्ग जलद लोकल, मेल एक्सप्रेस आणि मालगाड्यांसाठी वापरण्यात येत होते. पण उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस ट्रेन वेगळ्या करण्यासाठी दोन अतिरिक्त मार्गांचे म्हणजे 5 व्या आणि 6 व्या मार्गांची योजना आखण्यात आली होती. त्याच मार्गांचे आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. नवीन दोन मार्गामुळे ठाणे ते दिवा दरम्यानचा मध्य रेल्वेचा खोळंबा आता कायमचा दूर होणार आहे. यामुळे कसारा, आसनगाव आणि कर्जत, बदलापूरहून येणाऱ्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा मुंबईला जाण्याचा वेळ आणखी कमी होणार आहे.