अजूनही 20-25 जण अडकल्याची भीती
ऑनलाईन टीम / भिवंडी :
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत येथे पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पटेल कंपाऊंड परिसरातील जिलानी येथे ही घटना घडली. त्यामुळे या भागात भीती आणि गोंधळाची परिस्थिती उदभवली आहे. घटनास्थळी एनडीआरएफची, पोलिसांची टीम पोहोचली असून बचावकार्य सुरू आहे. बचावकार्यादरम्यान तीन ते चार वर्षांच्या एका चिमुरड्या मुलाला आणि त्याच्या वडिलांनाही ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, ही इमारत अत्यंत दाटीवाटीच्या भागात असल्यामुळे जेसीबी, डंपर थेट घटनास्थळी पोहोचण्यात अडथळे येत आहेत.
दरम्यान, जखमींवर तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारही सुरु करण्यात आले आहेत. जिलानी ही इमारतही अतिधोकादायक इमारतींपैकी एक असून, पालिकेकडून सदर इमारतीतील रहिवाशांना याबाबतची नोटीसही दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पालिका प्रशासनाकडून आणि राज्य शासनाकडून कोणती कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.