एपीएमसी रस्त्याचे काम दोन वर्षांपासून सुरूच : उत्तरेकडील प्रवेशद्वारही बंद
वार्ताहर / कंग्राळी खुर्द
रस्ता बांधकामाच्या ठेकेदाराचा बेजबाबदारपणा आणि कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यकारिणी आणि अधिकारी वर्गाचा दुर्लक्षितपणाचा फटका बाजार समितीमधील शेतकरी, व्यापारी, खरेदीदार वाहनचालकांना बसत आहे. त्यामुळे संबंधितांमधून नाराजी करण्यात येत आहे.
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारसमोरील वेंगुर्ला क्रॉस ते शिवमूर्तीपासूनच्या रस्ता बांधकाम आणि रुंदीकरणाचे काम चालू आहे. यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गतमधून निधी मंजूर झाला आहे. मात्र रस्ता बांधकाम ठेकेदाराच्या बेजबाबदार वागण्यामुळे हे काम जवळपास दोन वर्षाचा कालावधी होत आला तरी पूर्ण झाले नाही. याचा फटका या रस्त्यावरील वाहतुकीला होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बाजार समिती प्रवेशद्वारातील रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचासुद्धा अर्धा भाग करण्यात येत आहे. त्यामुळे बजार समितीमधील उत्तरेकडचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे.
वाहनचालकांना पुन्हा माघारी
गेल्या पंधरवडय़ापासून बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारचे उत्तरेकडील प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. त्यामुळे एकाच प्रवेशद्वारात वाहतुकीचा ताण पडत आहे. प्रवेशद्वार बंद असल्याचे फलक लावण्यात आले नाहीत किंवा वाहनचालकांना जागृती करण्यासाठी कोणत्याच उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे वाहने प्रवेशद्वारापर्यंत येऊन पुन्हा माघारी परतत आहेत. त्यामुळे वेळ आणि इंधनाचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय अवजड वाहनांना जवळपास 500 फूट पुन्हा माघारी न्यावे लागत आहे. याचा फटका दररोज शेकडो वाहनांना बसत आहे. त्यामुळे व्यापारी, शेतकरी आणि वाहनचालकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
बाजार समिती कार्यकर्त्यांनी दखल घेण्याची गरज
या रहदारी समस्येसंदर्भात रस्ता बांधकाम ठेकेदाराला कडक शब्दात समज देण्यात यावी. हा रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा किंवा रस्ता बंद असल्याचा फलक लावण्यात यावा, अशी मागणी येथील व्यापारी, शेतकरी आणि वाहनचालकांच्यावतीने करण्यात आली आहे.