शेवटच्या दिवशीही हजारांहून अधिक अर्ज दाखल, संगोळ्ळी रायण्णा-भिमांबिका सोसायटी ठेवीदारांची गर्दी, अजूनही काही जणांचे अर्ज येणे बाकी, मुदत वाढवून देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
संगोळ्ळी रायण्णा व भिमांबिका को-ऑप. सोसायटीमध्ये अधिक व्याज मिळत असल्याने अमेरिका, इंग्लंड यासह इतर देशांमधील भारतीयांनी या सोसायटीमध्ये ठेव ठेवली होती. त्यांचेही अर्ज आता रक्कम परत मिळावी यासाठी प्रांताधिकाऱयांकडे आले आहेत. एकूणच या सोसायटीचा डंका परदेशातही पसरल्याचे दिसून येत आहे. शेवटच्या दिवशीही अर्ज दाखल करण्यासाठी ठेवीदारांनी गर्दी केली होती. 1 हजारांहून अधिक अर्ज शेवटच्या दिवशी दाखल झाले असून आता छाननीनंतर एकूण अर्जांचा आकडा समजणार आहे.
संगोळ्ळी रायण्णा आणि भिमांबिका या सोसायटीमध्ये अनेकांनी मोठी रक्कम गुंतविली. व्याज अधिक मिळत असल्यामुळे साहजिकच अनेकांनी आपल्या आयुष्याची पुंजी या सोसायटीमध्ये ठेवली. मात्र सारेच ठेवीदार या सोसायटीच्या चेअरमनमुळे अडचणीत आले आहेत. संगोळ्ळी रायण्णा सोसायटीचे चेअरमन आनंद अप्पुगोळ यांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले. त्यानंतर त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
यामधील काही मालमत्तांचा वाद न्यायालयात सुरू आहेत. त्यामुळे सध्यातरी ठेवीदारांचे अर्ज घेतले गेले आहेत. मालमत्तेच्या लिलावानंतरच ठेवीदारांना ही रक्कम मिळणार आहे. जिह्याबरोबरच परराज्यातील तसेच परदेशातीलही भारतीय नागरिकांनी या सोसायटीमध्ये ठेवी ठेवल्या होत्या. 300 कोटीहून अधिक रुपयांचा गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे.
प्रांताधिकारी कार्यालयामध्ये अर्जदारांच्या अर्जाने अख्खी एक रुमच भरली आहे. या अर्जांची संख्या किती आहे हे आता छाननीनंतरच समजणार आहे. शुक्रवार दि. 24 रोजी शेवटचा दिवस असला तरी अजूनही काही ठिकाणच्या व्यक्तींना याची माहिती नाही. पुणे-मुंबईसह इतर राज्यात असणारे अनेक जण फोनवर चौकशी करत आहेत. त्यामुळे आणखीन मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी ठेवीदारांतून होत आहे. मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी याबाबत गांभीर्याने घ्यावे आणि यामध्ये मुदतवाढ करावी, अशी मागणी ठेवीदारांतून करण्यात येत आहे. या सोसायटीमधून कर्ज घेतलेल्या कर्जदारांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. नोटीस बजावून त्यांच्यावर रितसर वसुलीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर यांनी सांगितले.