वार्ताहर/ राजापूर
राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत असलेल्या शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये राजापूर नगरपरिषदेत मात्र ठोक निधीवरून धुमश्चक्री सुरू आहे. राजापूर शहरातील मुख्य रस्ते खड्डेमय झालेले असताना शासनाकडून राजापूर नगरपरिषदेसाठी प्राप्त झालेल्या 5 कोटी निधीतून सेना आमदार व नगरसेवकांनी वैयक्तिक कामे घेऊन निधीचा गैरवापर केल्याचा आरोप करत नगरपरिषदेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेच्या विरोधात खड्डेमय रस्त्यावर आंदोलन छेडले.
राजापूर शहरासाठी मिळालेल्या 5 कोटी ठोक निधीवरून सध्या सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेनेमध्ये खडाजंगी सुरू आहे. राजापूर शहरातील प्रमुख रस्ते खड्डेमय झाले असून जलवाहिन्याही जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे ठोक निधीतून शहरातील प्रमुख रस्ते, जलवाहिन्यांसह अन्य सार्वजनिक कामे सुचविली होती. मात्र शिवसेनेने कॉग्रेस-राष्ट्रवादीला विश्वासात न घेता ही यादी परस्पर बदलून शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक यांची वैयक्तिक कामे घेतल्याचा आरोप सत्ताधारी गटाकडून करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सत्ताधारी गटाने नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले. खड्डेमय बनलेल्या शिवाजीपथ मार्गावर उभे राहून सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाच्या नगरसेवकांनी घोषणा देत आंदोलन केले. यावेळी ठोक निधीतून शहरातील सार्वजनिक हिताची कामे झालीच पाहिजेत अशी मागणी सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी केली. शिवसेना गटनेते, आमदार, राजापूर शहराचे व्यापक जनहीत विचारात घेऊन शिवाजी पथ रस्ता, कोंढेतड चव्हाटा रस्ता, बंगलवाडी रस्ता, सरखोत मार्ग, शिळ जॅकवेल पाणीपुरवठा वाहीनी या सार्वजनिक हिताच्या कामांना ठोक निधीतून मंजूरी देऊन राजापूर शहराच्या विकासाला हातभार लावणार का, असा सवाल यावेळी सत्ताधाऱयांनी उपस्थित केला.
यावेळी उपनगराध्यक्ष संजय ओगले, नगसेवक सुलतान ठाकूर, सुभाष बाकाळकर, हनिफ युसूफ काझी, मुमताज काझी, स्नेहा कुवेसकर, परवीन बारगीर, भाजपा नगरसेवक गोविंद चव्हाण आदी उपस्थित होते.