चार दिवसापासून नागरिक अंधारात ; मोबाइलला नेटवर्क नाही
प्रतिनिधी/ परळी
गेल्या चार दिवसापासून ठोसेघर, ता. सातारा परिसरातील 20 पेक्षा अधिक वाडय़ा वस्त्यांमधील वीज (बत्ती गुल) झाली असल्यामुळे चार दिवसांपासून नागरिक अंधारात आहेत. वीज नसल्यामुळे पर्यायाने मोबाइलचे टॉवर बंद पडल्यामुळे मोबाइलला नेटवर्क येत नसल्यामुळे गेल्या चार दिवसापासून ठोसेघर पठार भागातील नागरिकांचा कोणाशीही संपर्क होऊ शकत नाही. दरम्यान, वीज वितरण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी याबाबत अनभिज्ञ असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधितांनी वीज पुरवठा पूर्ववत करावा, अन्यथा ठोसेघर पठार भागात एकाही अधिकारी, कर्मचाऱयाला फिरू देणार नसल्याचा इशारा बाबाराजे युवा मंचचे ठोसेघर पठार अध्यक्ष प्रवीण चव्हाण यांनी दिला आहे.
याबाबत वीज वितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता वीज पुरवठा सुरळीत होईल, अशा पद्धतीची उत्तरे दिली जात आहेत. ठोसेघर पठार विभागात गेल्या चार दिवसापासून विजेचा खेळखंडोबा झाला आहे. वीज नसल्यामुळे बॅटरी चार्जिंग करता येत नाही. गिरण बंद असल्यामुळे महिलांना जात्यावर दळण दळावे लागत आहे. रात्रीच्या वेळी शेतीची राखण करण्यासाठी नागरिकांना बाहेर पडणे मुश्कील झाले आहे.