शाळा कधी सुरू होणार? : क्वारंटाईनचा प्रश्न : ऑनलाईन शिक्षणाचा नेटवर्क परिघ अपूर्णच
भाग्यविधाता वारंग / झाराप:
स्थानिक परिस्थितीनुसार शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबतची अंमलबजावणी शासन धोरणानुसार सुरू असताना जुलैपर्यंत नववी-दहावीचे संभाव्य वर्ग सुरू होतील, या अपेक्षेने जिल्हय़ातील व विशेषतः ग्रामीण भागातील बहुतांशी शाळा कोविड-19 च्या अनुषंगाने सॅनिटराईज होऊन सज्ज होत होत्या. तर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी येणार असल्याने समितीकडून पुन्हा क्वारंटाईनसाठी हायस्कूलची मागणी सुरू झाली आहे. शाळा पुन्हा क्वारंटाईनसाठी दिल्यास शाळा सुरू होण्यास ऑक्टोबर उजाडण्याची शक्मयता वर्तवली जात आहे. त्यातच ऑनलाईन शिक्षणाचा नेटवर्क परिघच पूर्ण होत नाही. त्यामुळे पालक हैराण आहेत. अशा परिस्थितीत ठोस धोरण नसल्याने विद्यालयांसमोरील एकूणच पेच सध्या वाढता आहे.
स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबतचे परिपत्रक शासनाने 15 जून रोजी निर्गमित केले होते. नववीपासून पुढचे वर्ग पहिल्या टप्प्यात जुलैपासून सुरू होण्याची अपेक्षा होती. त्यानुसार पालक सभा, शाळा व्यवस्थापन, ग्राम समिती आदींशी चर्चा करून अंमलबजावणी करण्याची कार्यवाही सुरू झाली होती. विशेषत: जेथे कोरोना रुग्ण आढळला नाही. तसेच शाळेत येणारे विद्यार्थी सार्वजनिक प्रवास सुविधेने येत नाहीत व ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन व्यक्ती नाहीत, अशा ठिकाणी शाळा सुरू करण्यासंदर्भात एकवाक्मयता होत होती. त्यानुसार ग्रा. पं. तसेच संस्था-शाळा स्तरावरून शाळा सॅनिटराईज करून घेतल्या जात होत्या.
लॉकडाऊनमुळे शाळा सुरू करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक
सिंधुदुर्गात दोन जुलैपासून लॉकडाऊन प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे शाळा सुरू करण्याच्या प्रक्रियेला ब्रेक लागला. मधल्या काळात विद्यालयात क्वारंटाईन होणाऱयांची संख्याही शून्यापर्यंत आली होती. एसटी प्रशासनानेही शाळातील विद्यार्थी संख्या मागवून प्रवास व्यवस्थेबाबत कार्यवाही सुरू केली होती. अशा बाबींमुळे शाळा सुरू होण्याची अपेक्षा वाढली होती.
शैक्षणिक वर्षभराचे कामकाज कसे पूर्ण होणार?
गणेशोत्सवाला येणाऱया चाकरमान्यांना क्वारंटाईन होण्यासाठी पुन्हा हायस्कूलची मागणी होऊ लागली आहे. शाळा एकदा जंतूनाशक करून झाल्या. आता पुन्हा क्वारंटाईन, त्यानंतर पुन्हा सॅनिटराईज अशा प्रक्रियेत शाळा सुरू व्हायला ऑक्टोबर महिना उजाडणार आहे. ऑक्टोबरअखेर शाळांचे पहिले सत्र संपते. अशावेळी पुढच्या अर्ध्या सत्रात पूर्ण शैक्षणिक वर्षभराचे कामकाज कसे पूर्ण होणार?, याची चर्चा सुरू झाली आहे.
आरोग्यदायी निर्बंध
बालवयात विद्यार्थ्यांनी मोबाईलची छोटी स्क्रीन किती वेळ पाहावी, यावरही आरोग्यदायी निर्बंध आहेत. ज्यांच्याकडे मोबाईल आहे, रेंज आहे, अशा पालकांचे म्हणणे आहे की, अभ्यासाची प्रक्रिया एकांगी चालली आहे. आंतरक्रिया होतच नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आकलन, उपयोजन या महत्वाच्या मानसिक क्षमतांचे काय?, असा प्रश्न सुशिक्षित पालकांकडून विचारला जात आहे. ऑनलाईन शिक्षणाबाबत शासनाकडून सतत माहिती मागवली जात आहे. या सर्व मुद्यांच्या अनुषंगाने प्राप्त होणारी माहिती एकूणच शिक्षण प्रक्रियेची काळजी वाढवणारी असल्याचे बोलले जात आहे.
निरंतर शिक्षणाच्या वाटचालीबाबत कार्यवाही व्हावी
केवळ ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय हा पुरेसा व पर्याप्त नसल्याचे पालक कबूल करू लागले आहेत. शिक्षकही याबाबतीत अस्वस्थ आहेत. काळाबरोबर चालले पाहिजे हे खरे आहे. परंतु तांत्रिक बाबींची पूर्तताच होत नसेल, तर काय करणार? त्यामुळे मानसशास्त्राचा विचार करून निरंतर शिक्षणाची वाटचाल कशी सुरू ठेवायची, याबाबत वास्तव विचार कार्यवाही सुरू व्हावी, असे बोलले जात आहे. नपेक्षा या वर्षात बाहेर पडणाऱया विद्यार्थी पिढीचं काय? आपल्या भवितव्याची जबाबदारी कोण घेणार?, असा प्रश्न हे विद्यार्थी विचारू लागले आहेत. अर्थात शिक्षण प्रक्रियेच्या टप्प्यावर स्वयंशिस्तीतून सामाजिक आचरणाचा वसाही महत्वाचा राहणार आहे.