मंत्रिपद मिळण्याचे स्वप्न अधुरेच
प्रतिनिधी /बेंगळूर
भाजप हायकमांडने बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार झाला आहे. अधिकाधिक जिल्हय़ांना आणि समुदायांना प्रतिनिधीत्त्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तरी देखील डझनहून अनेक आमदारांचे मंत्री बनण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
ज्येष्ठांना पक्ष संघटनेच्या कामात गुंतवणूक मंत्रिमंडळात नव्या चेहऱयांना संधी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, केवळ सहा नव्या चेहऱयांनाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार असणारे एम. पी. रेणुकाचार्य, भालचंद्र जारकीहोळी, हरताळू हालप्पा यांची देखील निराशा झाली आहे. त्याचप्रमाणे मंत्रिपदासाठी इच्छूक असणारे आमदार माडाळू वीरुपाक्षप्पा, कुमार बंगारप्पा, राजूगौडा नायक, शिवनगौडा नायक, प्रीतम गौडा, एस. ए. रामदास, पूर्णिमा श्रीनिवास, तिप्पारेड्डी, सतीश रेड्डी, हालाडी श्रीनिवास शेट्टी, शिवराज पाटील, नेहरु ओलेकार, यांच्यासह अनेक आमदारांना मंत्रिपद मिळालेले नाही. त्यामुळे नाराज असून त्यांचे समर्थक आंदोलन करीत आहेत.
राज्यात भाजप सत्तेवर आल्यानंतर आपल्याला मंत्रिपद मिळेल, अशी आशा अनेकांना होती. त्यातही मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव म्हणून काम केलेले एम. पी. रेणुकाचार्य, निगम मंडळाचे अध्यक्षपद भूषविणारे राजूगौडा नायक यांना मंत्रिपद मिळण्याची 100 टक्के खात्री होती. मात्र, त्यांना बोम्माई यांच्या मंत्रिमडळात स्थान मिळाले नाही.