वारंवार चुकीचा नकाशा प्रदर्शित – त्वरित चूक सुधारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक आरोग्य संघटनेच्या नकाशांमध्ये भारताच्या सीमांना चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात येत आहे. भारताने यावर तीव्र आक्षेप घेत डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस यांना पत्र लिहिले आहे. चुकीचा नकाशा त्वरित सुधारण्यात यावा, असे भारताने पत्रात नमूद केले आहे. या मुद्दय़ावर भारताकडून मागील एक महिन्यात डब्ल्यूएचओला पाठविण्यात आलेले हे तिसरे पत्र आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी इंद्रमणि पांडे यांनी डब्ल्यूएचओ प्रमुखांना याविषयी माहिती दिली आहे.
डब्ल्यूएचओच्या विविध पोर्टल्सवर नकाशांमध्ये भारताच्या सीमा चुकीच्या पद्धतीने दर्शविण्यात आल्याने अत्यंत नाराजी व्यक्त करतो. याप्रकरणी पाठविण्यात आलेल्या मागील संदेशांची आठवण करून देऊ इच्छितो. त्वरित हस्तक्षेप करून भारताच्या सीमा चुकीच्या पद्धतीने प्रदर्शित करणे बंद करा. कृपया योग्य नकाशांचा वापर करा असे पांडे यांनी डब्ल्यूएचओ प्रमुखांना कळविले आहे.
डब्ल्यूएचओच्या नकाशांमध्ये जम्मू-काश्मीर तसेच लडाखला उर्वरित भारतापेक्षा वेगळय़ा रंगात दाखविण्यात आले आहे. 5,168 चौरस किलोमीटरमध्ये फैलावलेल्या शक्सगाम खोरे चीनचा हिस्सा असल्याचे दर्शविण्यात आले आहे. शक्सगाम खोरे पाकिस्तानने 1963 साली अवैध स्वरुपात चीनला सोपविले होते. 1954 मध्ये चीनने कब्जा केलेले अक्साई चीन क्षेत्र निळय़ा रंगात प्रदर्शित करण्यात आले आहे.