प्रतिनिधी/ सातारा
गेल्या सहा वर्षापासून महत्वकांक्षी असलेल्या महाबळेश्वर ते विटा या रस्त्याच्या चौपदरीकरण कामामध्ये सगळय़ा बाजूकडे अतिक्रमणे काढून रस्ता केला जात आहे. परंतु सातारा शहरात करंजे नाका ते लक्ष्मी मंदिरापर्यंतचे रुंदीकरण रखडलेले गेले आहे. कोणाच्या राजकीय दबावामुळे येथील अतिक्रमणे हटवली जात नाहीत, अशी चर्चा सुरु असून बांधकाम विभागाने अतिक्रमण न काढताच डांबरीकरण करण्याचा घाट घातला आहे. एका बाजूने डांबराचा लेअर टाकला गेला आहे. महाबळेश्वर-विटा या 118 किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण होत असले तरी करंजे नाक्यावरील 300 मीटर रस्ता राजकीय दबावामुळे दोन पदरी राहणार असल्याचे दिसत आहे.
सातारा शहरातून जुना महामार्ग जातो. त्याच रस्त्याचे काम गेल्या सहा वर्षापासून महाबळेश्वर ते विटा या रस्त्याच्या रुंदीकरणाचे व डांबरीकरणाचे काम सुरु आहे. हे काम सध्या सुरु आहे. हे काम होत असताना करंजे नाका येथील अतिक्रमणे हटवली गेली नाहीत. दोन्ही बाजूने अतिक्रमणे असल्याने रस्ता अरुंद आहे. गेल्या कित्येक वर्षापासूनचा हा प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी बांधकाम विभागही काहीच हालचाल करत नाही. त्यांच्यावर दोन्ही नेत्यांचा दबाव असल्याने कोणतीही कार्यवाही केली नसल्याची चर्चा सुरु आहे. हा रस्ता दिलेल्या मुदतीत होणे गरजेचे होते परंतु रस्ता झाला नाही. दोन दिवसांपूर्वी जावलीच्या बांधकाम विभागाने डांबराचा एक थर टाकला गेला आहे. त्यामुळे अतिक्रमण न काढता रुंदीकरण न करता डांबरीकरण केले जात आहे.
सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया
याच रस्त्याच्या चौपदरीकरण कामामध्ये अतिक्रमणे हटवण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. ती अतिक्रमणे हटवण्याकरता कोणी जो पुढाकार घेईल त्यांना मताचा फटका बसेल, आणि या परिस्थितीच्या विरोधात कोणी बोलायला तयार नाही. मात्र, सोशल मीडियावर सुरु असलेल्या कामांबाबत तिखट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. त्यातील एक प्रतिक्रिया म्हणजेच डांबरीकरण सुरु झाले पण रुंदीकरण कुठे गेले? रस्ता रुंदीकरण मोळाचा ओढा ते करंजे इथेपर्यत पटकन झाले पण करंजे ते भुविकास चौक रस्ता रुंदीकरण का होईना? देव जाणे, अशी आहे. ‘अरे कुठं नेवून ठेवलाय सातारा माझा’, अशी होती.