गोव्याच्या संस्कृतीला फासला काळिमा : पोलीस निरीक्षकाच्या नोटिसीवरून पोलखोल,अमरनाथ पणजीकर यांचा सनसनाटी आरोप
प्रतिनिधी /पणजी
राज्यात ’डान्स बार’ना परवानगी देऊन भ्रष्ट भाजप सरकारने स्वार्थासाठी गोव्याच्या संस्कृतीला काळिमा फासला आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे. अशाप्रकारे गोव्याच्या अस्मितेवर घाला घालणाऱया भ्रष्ट भाजपाला हद्दपार करण्याची आजच्या ऐतिहासिक ’ओपिनियन पोल’ दिनी गोमंतकीयांनी शपथ घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
कळंगुटचे पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी 11 जानेवारी 2022 रोजी जारी केलेल्या नोटिसीवरून भाजपने राज्यात ’डान्स बार’ सुरु केले होते हे सिद्ध झाले आहे. त्यामागे ’मिशन 30 टक्के कमिशन’चे धोरण राबवणारे उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांचा हात असून त्यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची साथ मिळाल्याशिवाय हे काम झालेले नाही, हेच सत्य आहे, असे पणजीकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांचे गोव्याबद्दलचे प्रेम बेगडी
या एकूण प्रकारातून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या गोव्यावरील बेगडी प्रेमाची लक्तरे एका पोलीस अधिकाऱयानेच वेशीवर टांगली आहेत. त्यामुळे आता निदान शिल्लक राहिलेली लाज राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब खुर्ची सोडून घरी बसावे, असा सल्ला पणजीकर यांनी दिला आहे.
गोव्यातील खाण उद्योग रसातळाला नेल्यानंतर भाजप सरकारने गोव्याच्या पर्यटन उद्योगाचा बट्टय़ाबोळ केला. अनैतिक व बेकायदेशीर व्यवसायांना प्रोत्साहन देऊन भाजप सरकार तसेच त्यांचे मंत्री व पदाधिकाऱयांनी आपली तुंबडी भरली, असा घणाघाती आरोपही पणजीकर यांनी केला आहे.
भाजपकडून गोव्याचे अनोखे ’परिवर्तन’
राज्यात परिवर्तन घडविण्याची स्वप्ने दाखवून भाजप सरकारने 10 वर्षांपूर्वी सत्ता काबीज केली. मात्र या काळात आपल्या सुरम्य, सुसंस्कृत, सुविद्य, सुशासित व स्वानंदी गोव्याला या सरकारने गुन्हेगारांचा अड्डा बनवला. राज्यातील पर्यावरणाचा ऱहास करून या सरकारने निसर्गाचा वरदहस्त लाभलेला गोवा मोदींच्या क्रोनी क्लबच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला, असे आरोप करून ’भाजपने केलेले ’परिवर्तन’ ते हेच का?’ असा सवाल पणजीकर यांनी उपस्थित केला.
’अस्मिता दिनी’ गोमंतकीयांनी शपथबद्द व्हावे
गोव्याची संस्कृती, परंपरा व वारसा जपण्यासाठी गोमंतकीयांनी भाजपला धडा शिकवणे काळाची गरज आहे. आजच्या ’अस्मिता दिनी’ गोमंतकीयांनी यावर सखोल विचार करून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.