उत्तर बंगालमधील 10 मतदारसंघ – राहुल गांधी यांनी घेतली आहे सभा
उत्तर बंगाल या भागातील राजकारणाला अनेक कंगोरे प्राप्त आहेत. उत्तर बंगालचे सर्वात मोठे वाणिज्यिक केंद्र ठरलेले सिलिगुडी असो किंवा व्यवस्थेच्या विरोधात शस्त्रांच्या बंडाचा पर्याय ठरलेले नक्षलबाडी असो, येथील प्रत्येक मतदारसंघाची स्वतःची अशी एक कथा आहे. सिलीगुडी समवेत परिसरातील 10 मतदारसंघ मायनागुडी, जलपाईगुडी, राजगंज, डाबग्राम पुलवारी, नगरा काटा, माल, माटीगारा-नक्षलबाडी, फांसीदेवा आणि धुपगुरीमध्ये शनिवारी मतदान पार पडले आहे.
एकेकाळी डाव्या पक्षांचा बालेकिल्ला असलेल्या या भागात जवळपास प्रत्येक मतदारसंघात भाजप चुरशीची लढत देत आहे. तृणमूल काँग्रेस असो किंवा डावे-काँग्रेस यांचा संयुक्त मोर्चा दोघेही स्वतःचा मुख्य विरोधक भाजपलाच मानतात. नक्षलबाडीत काँग्रेस-माकपचे विद्यमान आमदार शंकर मालकार असो किंवा तृणमूलचे राजेन सुंदास दोघेही स्वतःची लढत भाजपशी असल्याचे मानत आहेत. भाजपने स्वतःचे जुने नेते आनंदमय वर्मन यांना उमेदवारी दिली आहे. तृणमूलने अखेरच्या काळात उमेदवार बदलला आहे. नलिनी रंजन राय यांना हटवून राजेन यांना तिकीट देण्यात आले.
या बदलामागे बिमल गुरुंग यांचा हात होता. उमेदवार बदलल्याने गोरखा समुदायाचे लोक तृणमूल काँग्रेसला मतदान करतील, यातून या समुदायाचा प्रभाव असलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये विजय मिळविणे सोपे ठरणार असल्याचा उद्देश होता. नक्षलबाडीत लेनिन, स्टॅलिन, माओ, लीन प्याओ, चारू मजूमदार, सरोज दत्ता तसेच महादेव मुखर्जी यांचे पुतळे एकत्र, एकाच रांगेत आहेत. नक्षलबाडी आंदोलनात जीव गमावलेल्या लोकांचे स्मारक आहे, पण या भागात लोकांना उत्तम जीवनाच्या अपेक्षा लागून राहिल्या आहेत.
या क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून गृहमंत्री अमित शाह, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच ममता बॅनर्जी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही प्रचारसभा घेतली आहे. राहुल यांनी माटीगरा-नक्षलबाडी तसेच उत्तर दिनाजपूरमध्ये सभा घेतली आहे.
राजवंशी, आदिवासी, गोरखा, बंगाली आणि बिहारींचे प्रमाण अधिक असलेल्या या मतदारसंघांमध्ये सिलिगुडी या एकाच ठिकाणी माकपचे पारडे जड असल्याचे दिसून येते. सिलिगुडीमध्ये माकपचे उमेदवार अशोक भट्टाचार्य आणि भाजप उमेदवार शंकर घोष यांच्यात मुख्य लढत आहे. डाव्यांच्या या बालेकिल्ल्यात भट्टाचार्य यांचे पारडे जड आहे. तसेही तृणमूलचे ओमप्रकाश मिश्राही मुख्य लढतीत सामील होण्यासाठी जोर लावत आहेत. शंकर घोष यांनी अलिकडेच माकपमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांची ओळख भट्टाचार्य यांचे शिष्य म्हणूनच होती. डाव्या पक्षांच्या सरकारमध्ये भट्टाचार्य 4 वेळा मंत्री राहिले आहेत.