लाडू हा पदार्थ बहुतेक साऱ्यांच्या आवडीचा असतो. अपवाद फक्त मधुमेहाच्या रुग्णांचा. त्यांनाही तो आवडतो पण खाता येत नाही. तथापि, आग्रा येथील संशोधनात असे आढळून आले आहे, की डासांच्या अळ्यांनाही (लार्वा) लाडूवर ताव मारण्याचा मोह होतो. अर्थात, हे लाडू वेगळ्या प्रकारचे असतात. ते बुंदी, बेसन किंवा रव्याचे नसून बीटीआय आणि टेमिफोस या रासायनिक द्रव्यांच्या मिश्रणातून बनलेले असतात. पण हे लाडू बनविण्याची प्रक्रिया मात्र नेहमीच्या लाडूसारखीच असते.
छोट्या आकाराचे हे लाडू डासांची पैदास होणाऱ्या पाणथळ जागी ठेवल्यास डासांच्या अळ्या त्यांच्यावर तुटून पडतात आणि हे लाडू खाऊन त्या मरून जातात. त्यामुळे डेंग्यू किंवा मलेरियासारख्या विकारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी या लाडूंचा उत्तम उपयोग होतो, असे संशोधनात दिसून आले आहे. हे लाडू केवळ डासांच्या अळ्यांनाच मारतात. पाणथळ जागी असलेल्या इतर जलचरांना कोणताही त्रास देत नाहीत. तसेच पाणी कायमचे विषारी करीत नाहीत. त्यामुळे डासांची पैदास रोखण्याचा एक प्रभावी उपाय म्हणून या संशोधनाकडे पाहिले जात आहे.
आता या लाडवांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करण्याची योजना आहे. उत्तर प्रदेश सरकारनेही या उत्पादनात रस दाखविला आहे. या राज्याच्या मैनपुरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हा प्रयोग केला जात आहे. लाडूप्रमाणेच या रासायनिक द्रव्यांपासून पेस्ट बनविण्याचे प्रयोगही सुरू आहेत. डासांच्या त्रासावर हा रामबाण उपाय असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.