पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन : तीन दिवसीय बेंगळूर तंत्रज्ञान परिषदेचे उद्घाटन
प्रतिनिधी/ बेंगळूर
डिजिटल इंडिया जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. ही योजना देशातील लोकांच्या जीवनशैली बदलली असून त्यामुळे त्यांचे जीवनमान बदलले आहे. हा मुद्दा देशाच्या डिजिटल विकासाची साक्ष आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. बेंगळूरमध्ये गुरुवारपासून सुरू झालेल्या तीन दिवसीय बेंगळूर तंत्रज्ञान परिषदेचे दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
पाच वर्षांपूर्वी केंद्र सरकारने डिजिटल इंडिया संकल्पनेची ओळख जनतेला करून दिली होती. त्यामुळे आता लोकांची जीवनशैली बदलली आहे. जागतिक वैविध्यता तंत्रज्ञानावर अवलंबून आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. आरोग्य, शिक्षण, विकासकामे यासह अनेक क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. देशातील प्रत्येक घरापर्यंत वीज पोहोचविण्यात आली आहे. याला तंत्रज्ञानच कारणीभूत आहे, असे ते म्हणाले.
देशात 25 वर्षांपूर्वी इंटरनेट सुविधा आली. पण मागील चार वर्षात निम्म्याहून अधिक इंटरनेट वापरकर्त्यांचा समाविष्ट झाले आहे. कोरोनाकाळात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रशासकीय कामांची हाताळणी झाली. यापूर्वी तंत्रज्ञान क्षेत्र यापूर्वी गरीबांच्या जीवनाचा भाग नव्हता. आता गरीब देखील तंत्रज्ञानाचा भाग बनले आहेत. डिजिटल पेमेंट व्यवस्था ही तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती आहे. 2 दशलक्ष व्यवहार डिजिटल पेमेंट व्यवस्थेमध्ये आले आहेत. माहिती तंत्रज्ञानात मैलाचा दगड पार केल्यास भारत ब्रह्मांड म्हणून जगभरात नावलौकिक मिळवेल, असा आशावाद पंतप्रधानांनी व्यक्त केला.
डिजिटल तंत्रज्ञानाच्या विकासावर केंद सरकारने भर दिला असून 1 हजार दिवसांमध्ये 6 लाख कि. मी. लांबीचे ऑप्टीक फायबर केबलचे जाळे निर्माण करण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय तंत्रज्ञान आणि संवहन खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली. तंत्रज्ञान परिषदेमध्ये व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी होऊन ते बोलत होते. कोरोनाकाळात देशाने तंत्रज्ञान क्षेत्रात 7 टक्के प्रगती साधली आहे. पुढील पाच वर्षात देशात 11 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. ऍपल कंपनीने मोबाईल आणि सुटे भाग तयार करणारी चीन व इतर देशांमधील आपली केंद्रे भारतात हलविली आहे. याचा लाभ कर्नाटकालाही झाला आहे, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.