रशियाच्या सुरक्षा यंत्रणेमुळे वाढणार बळ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रशियाकडून निर्मित एस-400 क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा चालू वर्षाच्या अखेरपर्यंत भारताला प्राप्त होणार आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारी ही सुरक्षा यंत्रणा मिळाल्याने भारताची मारक क्षमता अधिकच बळकट होणार आहे. इंटरनॅशनल मिलिट्री-टेक्निकल फोरम ‘आर्मी-2021’ला संबोधित करताना अल्माज एंटे कंपनीचे पदाधिकारी वाचेस्लाव डिजिरकलन यांनी ही माहिती दिली आहे.
एस-400 यंत्रणेकरता भारतीय सैनिकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. पहिल्या गटाचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. तर दुसऱया गटाचे प्रशिक्षण सुरू असल्याचे वाचेस्लाव यांनी सांगितले. भारताने ऑक्टोबर 2018 मध्ये सुमारे 40 हजार कोटी रुपयांचा 5 एस-400 यंत्रणा खरेदी करण्याचा व्यवहार केला होता.
भारत तिसरा देश ठरणार
एस-400 क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा प्राप्त करणारा भारत जगातील तिसरा देश ठरणार आहे. रशियाने यापूर्वी चीन आणि तुर्कस्तानसोबत याचा व्यवहार केला आहे. रशियाने अलिकडेच तुर्कस्तानला काही यंत्रणा पुरविल्या देखील आहेत.
एस-400 यंत्रणा
एस-400 हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. या यंत्रणेद्वारे 400 किलोमीटरच्या परिघातील शत्रूची विमाने आणि क्षेपणास्त्रs नष्ट हवेतच नष्ट करता येतात. ही यंत्रणा एकाचवेळी 100 धोक्यांना ओळखू शकते. तसेच अमेरिकेकडून निर्मित एफ-35 सारख्या 6 लढाऊ विमानांवर एकाचवेळी क्षेपणास्त्र डागू शकते. याची मारकक्षमता अचूक असून एकाचवेळी तीन दिशांमध्ये प्रहार करू शकते.