अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 15 डिसेंबर 2021, सकाळी 11.15
● लसीकरणाच्या व्यापकतेने संभाव्य धोका टळला
● शहरी भागातही रूग्णवाढ आटोक्यात
● थंडीच्या कडाक्यातही रूग्णवाढ स्थिरावली
● जावली, खंडाळा तालुक्यात नवे रूग्ण नाहीत
● बुधवारच्या अहवालात 39 नवे रूग्ण वाढले
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला मुसळधार पावसाने हजेरी लावत वातावरण बदलून टाकल्याने कोरोनासह साथीचे आजार वाढतात की काय अशी भिती होती. मात्र जिल्ह्यात 1 डिसेंबर ते 14 डिसेंबर या कालावधीत रूग्णवाढ स्थिरावलेली आहे. विशेष म्हणजे गेले आठवडाभर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असतानाही रूग्णवाढ आटोक्यात ठेवण्यात यश आले आहे. वातावरणातील अचानकच्या बदलाचा कोणताही परिणाम कोरोना रूग्णसंख्येवर दिसून आला नसल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले. शिवाय जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील तीन हजारावर गावे कोरोनामुक्त झाली असून शहरी भागातही कोरोना आटोक्यात आला आहे. दरम्यान बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात जिल्ह्यात नव्याने 39 रूग्णांची वाढ झाली आहे.
पॉझिटिव्हीटी रेट 1.39 वर
जिल्ह्यात बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात नव्याने 39 बाधित वाढले आहेेत. तर गेल्या 24 तासात 2913 संशयितांची चाचणी झाली आहे. डिसेंबर महिन्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख घसरला आहे. बुधवारी 39 रूग्ण वाढले असून डिसेंबर महिन्याच्या 14 दिवसातील हा सर्वात जास्त आकडा आहे. मात्र तरीही रूग्णवाढ आटोक्यातच असून जिल्ह्यातील अनेक तालुक्यांची वाटचाल कोरोनामुक्तीकडे निघाली आहे.
ग्रामिण भागात भिती संपुष्टात
जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील अनेक गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तीन हजारांवर काही गावात गेल्या दीड महिन्यात एकही कोरोना रूग्ण आढळलेला नाही. अशा गावांची यादी तयार करण्याचे काम जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागाकडून सुरू आहे. दीड ते दोन महिन्यापासून एकाही रूग्णाची नोंद झाली नसल्याने अनेक गावातील कोरोना रूग्णवाढीची भिती कमी झाली आहे.
मंगळवारी जिल्ह्यात
नमुने -1457
बाधित -39
मृत्यू- 2
मुक्त -30
उपचारार्थ -166
जिल्ह्यात मंगळवारपर्यंत
नमुने-23,35,187
बाधित-2,52,128
मृत्यू-6,485
मुक्त-2,44745