काँग्रेसची मागणी, काँग्रेसतर्फे समाज कल्याण खात्याला घेराव
प्रतिनिधी / पणजी
ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत येणारे पैसे काही महिने नागरिकांना मिळालेले नाहीत. या विरोधात बुधवारी गोवा काँग्रेस पक्षातर्फे समाज कल्याण संचालनालयाच्या बाहेर निदर्शने करून खात्याचे अधिकारी तहा हाजीक यांना घेराव घालून जाब विचारला. यावेळी काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर, अमरनाथ पणजीकर, जर्नादन भंडारी, वरद म्हार्दोळकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्येष्ठ नागरिकांचे हक्काचे दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे पैसे गेले सहा ते आठ महिने त्यांना मिळालेले नाहीत. येथे कोरोनामुळे अनेक जणांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, अशावेळी ही योजना बंद करणे म्हणजे लोकांना अधिक संकटात टाकणे असे झाले आहे. सरकारला याविषयी काहीच पडलेले नाही. मंत्री आपले खिसे भरण्यास व्यस्त आहेत, असा आरोप संकल्प आमोणकर यांनी केला.
या योजनेतील पैसे केव्हा सुरु करणार व आतापर्यंत एवढे महिने ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे पैसे का मिळाले नाहीत याबाबत जाब विचारला असता आमच्या खात्यातर्फे सर्व प्रक्रिया केली असून लेखा संचालनालयाकडून पुढे काहीच झालेले नाही, असे समाज कल्याण खात्यातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे सरकारची महत्त्वाची खाती किती जबाबदार आहेत हे दिसून येत आहे.
31 ऑक्टोबरपर्यंत पैसे जमा करा
पुन्हा एकदा या ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच सर्वेक्षण करुन त्यांना नाहक त्रास देण्याचे काम सुरु आहे. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत ही योजना सुरु न झाल्यास तसेच एवढे दिवस राहीलेले पैसे जमा न केल्यास दि. 1 नोव्हेंबर 2020 रोजी परत एकदा सर्व ज्येष्ठ नागरिकांसह समाज कल्याण खाते कार्यालयात जमा होणार आहे, असे आमोणकर यांनी पुढे सांगितले.
सर्व खात्यात भ्रष्टाचार : वरद म्हार्दोळकर
सरकार राज भवन, विधानसभा व इतर वास्तू बांधायला पैसे मंजुर करत आहे. मात्र सामान्य लोकांचा विचार सरकार करत नाही. सरकार हे गोवा लुटायला पाहत आहे. सरकारच्या सर्व खात्यात भ्रष्टाचार वाढत चालला आहे, असे वरद म्हार्दोळकर यांनी यावेळी सांगितले. समाज कल्याण खात्याने त्वरित ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात पैसे जमा करावे, असे जर्नांदन भंडारी यांनी सांगितले.
सरकार व मंत्री नाईक यांनी स्पष्टीकरण द्यावे
समाज कल्याण खाते कार्यालयाला घेराव घातल्यानंतर आम्ही लेखा संचालकाच्या अधिकाऱयांना देखील भेटलो. यावेळी या संदर्भातील फाईल्स आमच्यापर्यंत आल्याच नसून फाईल्स आल्यानंतर त्वरित प्रक्रीया पूर्ण करु, असे लेखा संचालनालयाचे अधिकारी सांगतात. मग या फाईल्स गेल्या कुठे? असा प्रश्न उपस्थित करून सरकारने व समाज कल्याण खात्याचे मंत्री मिलींद नाईक यांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
काँग्रेस पक्षाने घातलेल्या घेरावामुळे कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अथक परिश्रम घ्यावे लागले. या प्रकारानंतर काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर त्यांना सोडून दिले.