‘मेघोली’त 2 वर्षांपासून 50 टक्केच पाणीसाठा
कृष्णात पुरेकर/ कोल्हापूर
भुदरगड तालुक्यातील मेघोली लघुपाटबंधारे तलाव मध्यरात्री फुटला, पण त्यापुर्वी त्याला लागलेल्या गळतीमुळे दोन वर्षांपासून त्यात 50 टक्के पाणीसाठा होत होता. डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशनने प्रकल्पाची पाहणी करून सुचना केली होती. प्रकल्पाच्या ठिकाणी खडकाचे संशोधन सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यानंतरच अतिपावसामुळे की अन्य कोणत्या कारणामुळे दुर्घटना घडली, हे समोर येणार आहे.
भाजप-सेना युतीच्या काळात 1996 मध्ये मेघोली प्रकल्पाला मंजुरी मिळाली. प्रकल्पाचे काम 2000 मध्ये पुर्ण झाले, अन् पाणीसाठाही सुरू झाला. हा प्रकल्प 98 दशलक्ष घनफुट पाणीसाठय़ाचा आहे. त्याचे लाभक्षेत्र 736 हेक्टर आहे. लाभक्षेत्रात कोल्हापूर पद्धतीचे 11 बंधारे आहेत. दुधगंगा प्रकल्प कालवे विभागाकडे त्याचे व्यवस्थापन आहे. प्रकल्पातील दहापैकी 5 गावांना यातील पाण्याचा लाभ होतो. या भागात सरासरी वार्षिक 1456.45 मिलिमीटर पाऊस होतो. या आकडेवारीनुसार प्रकल्पाची उभारणी झाली होती. सध्या या भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे.
मेघोली लघुपाटबंधारे प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र 6.81 चौरस किलोमीटर आहे. हे धरण पुर्णत मातीचे आहे. धरणाची उंची 32.20 मीटर आहे. सांडव्यासह प्रकल्पाची लांबी 607.20 मीटर आहे. प्रकल्पासाठी 33.74 हेक्टर क्षेत्र संपादीत केले आहे. तसेच 3 वर्षांत प्रकल्प पूर्ण होताच 2000 पासून प्रकल्पात पाणीसाठा सुरू झाला. या प्रकल्पाची वर्षांतून दोनदा तपासणी होते. प्रकल्पाचे आयुष्यमान सरासरी 40 वर्षे अपेक्षित होते. पण गेल्या काही वर्षांत धरणातून झिरपणाऱया पाण्याचे, गळतीचे प्रमाण वाढले होते. त्यातूनच अवघ्या 20 वर्षात हा प्रकल्पाला धोका पोहोचला आहे.
डॅम सेफ्टी आॅर्गनायझेशनने मेघोली तलावाची पाहणी केली होती. त्यानंतर दोन वर्षांपुर्वी प्रकल्पात 50 टक्के पाणीसाठय़ाच्या सुचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी पाटबंधारे विभागाने केली होती. ‘डीएसओ’ने येथील खडकाची पाहणी केली होती. त्याचे संशोधन अद्यापी सुरू आहे. त्याचा अहवाल आल्यास प्रकल्पाच्या दुर्घटनेला अतिपाऊस की अन्य कोणते भौगोलिक कारण आहे, हे समोर येणार आहे. तलाव फुटला असला तरी लाभक्षेत्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱयांना धोका पोहोचला नसल्याचे दिसून आले आहे.