इचलकरंजी / प्रतिनिधी :
ग्रामीण भागात शेताच्या बांधावर नेहमी उपद्रवी ठरणाऱ्या इरमुंगळी (जट्रोफा) या वनस्पतीच्या बियांपासून ‘लिक्वीड व साबण‘ बनविला आहे.येथील डीकेटीई मधील टेक्स्टाईल डिप्लोमा विभागातील विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले आहे. इरमुंगळी वनस्पतीच्या बीयांमध्ये विषाणू आणि जिवाणूना प्रतिबंधित करण्याचा गुणधर्म असल्यामुळे त्यापासून बनविलेला साबण सध्याच्या कोरोना साथीमध्ये पर्यावरणपूरक हँड वॉशच्या स्वरुपात वापरता येवू शकतो.
याशिवाय अॅप्रन, मास्क, बँडेज इ. सॅनिटाईझ करण्यासाठी देखील सदर लिक्वीड व साबण उपयुक्त ठरत असल्यामुळे कोरोनासारख्या महाभयंकर रोगाचा यामुळे प्रादुर्भाव रोखता येतो. राहूल कांबळे, निखिल खडके व अमन पेंढारी या विद्यार्थ्यांनी प्रा.सौ. गौरी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले आहे.
भारतीय संस्कृतीत आयुर्वेदला महत्वाचे स्थान असून वनस्पतींपासून बनविलेली औषधे ही रुग्णांना गुणकारी ठरलेली आहेत. याचाच संदर्भ घेत डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी इरमुंगळी या वनस्पतींच्या बीयांवरती संशोधन केले. इरमुंगळीच्या बिया हया काही प्रमाणात विषारी असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्षित केले जाते. विद्यार्थ्यांनी या वनस्पतीच्या बियांचा योग्य असा उपयोग करुन या बीयांपासून प्रयोगशाळेमध्ये तेल काढले व या तेलापासून लिक्वीड व साबण बनवून त्याच्या सुती कापडावर प्रक्रिया करण्याच्या प्रयोगामध्ये त्यांना यश मिळाले.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर आज बाजारात उपलब्ध असलेले रासायनिक सॅनिटायझर किंवा साबण यांच्या अति वापरामुळे हात पांढरे पडणे, त्वचेस खाज सुटणे, पुरळ उटणे किंवा मोबाईलच्या स्क्रिनवर सॅनिटयाझर पडले तर मोबाईल स्क्रिन क्रॅक होणे असे दुष्परिणाम दिसून येत आहेत. पण वनस्पती पासून बनविलेल्या अशा आयुर्वेेदिक लिक्वीड सोप व हँडवॉश चा वापर मानवाच्या दररोजच्या वापरात आल्याने वरील दुष्परिणामापासून बचाव होतो. संशोधन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गुणकारी ठरल्याचे निदर्शनास आले आहे. इरमुंगळी बियाण्यापासून केलेले लिक्वीड २ ते ३ थेंब घेतल्याने हात निर्जंतुकीकरण होते व साबण नेहमीसारखा उपयोग केला जावू शकतो. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे डिकेटीईचे डायरेक्टर प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, डेप्युटी डायरेक्टर प्रा.डॉ.यु.जे. पाटील, डिप्लोमा विभागप्रमुख प्रा.एस.ए. शेट्टी यांनी अभिनंदन केले.