पालकमंत्री, खासदार यांनी दिले आश्वासन : शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांची माहिती : उर्वरित भिंतीही केव्हाही कोसळण्याची भीती व्यक्त
वार्ताहर / कणकवली:
कणकवलीतील हायवेच्या निकृष्ट कामाची चौकशी होऊन जनतेच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल ठेकेदार कंपनी दिलीप बिल्डकॉन व देखरेख करणाऱया आरटी फॅक्ट कंपनीला ब्लॅक लिस्टला टाकण्याची मागणी शिवसेना कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत व मुख्य अभियंता विनय देशपांडे यांच्याकडे निवेदानाद्वारे केली आहे. तसेच शहरातील धोकादायक असलेले काम काढून ते पूर्ण नव्याने करण्याबाबतचे आदेश संबंधितांना देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आल्याचे भोगले यांनी सांगितले. याबाबत संबंधिक कंपन्यांवर कडक कारवाईसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आश्वासन पालकमंत्री व खासदार राऊत यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली.
याबाबत या तिघांनाही दिलेल्या निवेदनात भोगले यांनी म्हटले आहे, महामार्ग चौपदरीकरण काम 9 फेब्रुवारी 2017 पासून सुरू करण्यात आले. कणकवली शहरातील बॉक्सेल ब्रिजची भिंत कोसळण्यापूर्वी महिनाभर याबाबत जनतेने ठेकेदार कंपनीचे लक्ष वेधले होते. याबाबत बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. प्रांताधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली बैठका घेत हायवेच्या अधिकाऱयांचेही लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, हायवे प्राधिकरण व ठेकेदार कंपनीने गांभिर्याने घेतले नाही. यातच बॉक्सेलची भिंत कोसळून माती बाहेर आली. आता उर्वरित भिंतीही केव्हाही कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे या निष्काळजीपणाबद्दल संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी.
निकृष्ट दर्जाच्या सिमेंट ब्रिक्सचा वापर
शहरातील 429 मीटरच्या सर्व्हिस रस्त्याच्या लांबीमध्ये निकृष्ट दर्जाच्या सिमेंट ब्रिक्स वापरण्यात आल्या असून 50 टक्के ब्रिक्सना उभ्या भेगा गेल्या आहेत. या ब्रिक्सचा थिकनेसही कमी आहे. त्यामुळे केव्हाही दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बांधकामाला लेव्हल नसून या भिंतीचे उभे बांधकाम 90 डिग्रीमध्ये झालेले नाही. या बॉक्सेल ब्रिजच्या भरावासाठी निकृष्ट मातीचा वापर करण्यात आला आहे. त्यातच यात पावसाचे पाणी गेल्याने भिंतीवर लोड येऊन कोसळण्यास सुरुवात झाली आहे. आरई वॉलचे काम पाडायला लागल्यानंतर त्याला आधार म्हणून आरसीसी भिंती उभारण्यात आल्या आहेत. मात्र, त्या भिंतींनाही फाऊंडेशन बेस व्यवस्थित नसल्याने या भिंती भविष्यात काढण्याची गरज आहे. या ठिकाणी टॉप लेअर पीक्सूसीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून अनेक ठिकाणी पीक्सूसी लेअर खचला आहे.
सर्व्हिस रोड खचले
गांगो मंदिर येथील अंडरपासच्या वरती पीक्सूसी लेअरला तडे जाऊन तोही खचला आहे. मात्र, ठेकेदार कंपनीने याची तातडीने दुरुस्ती करत हा प्रकार लपविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या 429 मीटर भागाचे पीक्सूसी लेअरचे काम पुन्हा नव्याने करण्याची गरज आहे. सर्व्हिस रोड खचले असून गटारांची कामे कोसळली आहेत. ही कामेही नव्याने करण्याची गरज आहे. कणकवली शहरातील वर्दळ विचारात घेता, शहरात संपूर्ण बॉक्सेल ऐवजी फ्लाय ओव्हर ब्रिजची गरज होती. मात्र, या कामाचा सर्व्हे चुकीचा झाला असून अंडरपास मागाहून मंजूर करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे.
जोडरस्त्यांची उंची कमी-जास्त
त्यामुळे जोडरस्त्यांची उंची कमी-जास्त झाल्याचा त्रास शहरवासीयांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या कामाच्या तांत्रिक मंजुरीबाबत चौकशी करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी भोगले यांनी केली आहे. 31 जुलै रोजी फ्लाय ओव्हर ब्रिजचा स्लॅब कोसळला. या स्लॅबच्या खाली उभारण्यात आलेल्या सपोर्टखाली काँक्रिट करण्यात आले नव्हते. अकुशल कर्मचाऱयांमार्फत हे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, ही बाब लपविण्यासाठी कंटेनरने धडक दिल्याची सारवासारव ठेकेदार कंपनी करत आहे. कणकवलीतील हायवेच्या कामाबाबत आरटी फॅक्ट या कन्सल्टंट कंपनीने कामाचे ड्रॉईंग, डिझाईन, सुपर व्हिजन ही कामे जबाबदारीने केली नसल्याची बाब समोर येत आहे. तसेच ठेकेदार कंपनीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याने ठेकेदार कंपनी व आरटी फॅक्टचे लागेबांधे आहेत. या कामात भ्रष्टाचार झालेला असून दोन्ही कंपन्यांची सखोल चौकशी होऊन कारवाईची मागणी भोगले यांनी केली आहे.