मंत्री एस. टी. सोमशेखर यांची माहिती : राज्यभरात कृषी कर्ज वितरणाला चालना
बेंगळूर : राज्य सरकार शेतकऱयांच्या संकटप्रसंगी नेहमीच पाठिशी राहिले आहे. जिल्हा सहकार बँकांमधून कर्ज घेतलेल्या शेतकऱयाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्याचे कर्ज माफ करण्याचा विचार मुख्यमंत्र्यांनी चालविला आहे. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सहकारमंत्री एस. टी. सोमशेखर यांनी दिली.
म्हैसूर जिल्हा सहकार बँकेच्या कर्ज वितरण कार्यक्रमात सहभागी होऊन ते बोलत होते. डीसीसी बँकांमधून कर्ज घेतलेल्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची यादी आणि त्यांच्या कर्जाचे विवरण सादर करण्याची सूचना आपण नुकताच अपेक्स बँक, डीसीसी बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिली आहे. तपशिल मिळाल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
20,810 कोटी कर्ज वितरणाचे उद्दिष्ट
यंदा राज्यातील 30 लाख शेतकऱयांना 20,810 कोटी रुपयांचे कृषी कर्ज वितरीत करण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांनी निश्चित केले आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील कृषी कर्ज वितरणाचे 100 टक्के उद्दिष्ट गाठण्याची सूचना आपण डीसीसी बँकांना दिली आहे, असे ते म्हणाले.