शहापूर चर्मकार वसाहतीमध्ये 12 रुग्ण असल्याची चर्चा : कोरोनासोबत डेंग्युचा प्रादुर्भाव वाढला
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोना विषाणूंचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. प्रत्येक परिसरात कोरानाचे रुग्ण, डेंग्युचे असल्याचे आढळून आले आहेत. त्याचबरोबर आता डेंग्यू आजाराने शहरात हात-पाय पसरण्यास प्रारंभ केला आहे. मजगावपाठोपाठ वडगाव, शहापूर परिसरात डेंग्युच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. डेंग्युने मागील आठवडय़ात एका मुलाचा बळी घेतला आहे. पण कोरोनाच्या कामात अडकलेल्या मनपा प्रशासनाने डेंग्युबाबत उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे डेंग्युचा विळखा वाढत चालला आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून देशात कोरेना विषाणूंचा प्रसार होत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने खबरदारी म्हणून लॉकडाऊन करण्यात आले होते. पण लॉकडाऊन कालावधीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली नाही. मात्र, मजगावसह विविध परिसरात डेंग्युचा फैलाव मोठय़ा प्रमाणात झाला होता. शहरातील विविध परिसरात डेंग्युची लागण झाली आहे. पण महापालिका प्रशासन कोरोनाबाबत खबरदारी घेत असल्याने याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहापूरसह विविध भागात डेंग्युसारख्या रोगराईने थैमान घातले आहे. मे महिन्यात डेंग्युचे अनेक रुग्ण निदर्शनास आले होते. तरीही महापालिका प्रशासन याबाबत सुस्तच होते. यामुळे डेंग्युच्या रुग्णात झपाटय़ाने वाढ झाली असून शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये डेंग्युचा फैलाव होत असल्याच्या तक्रारी आहेत.
एकीकडे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढत चालला असून दुसरीकडे डेंग्युच्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. पण कोरोना विषाणूंवरील लस किंवा औषधाचा शोध लागला नसल्याने महापालिकेसह आरोग्य खात्याने कोरोनाबाबत अधिक खबरदारी घेतली आहे. त्यामुळे डेंग्युबाबत खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी डेंग्युमुळे मागील आठवडय़ात वडगाव परिसरातील मुलाचा मृत्यू झाला होता. शहापूर परिसरातील चर्मकार वसाहतीमध्ये डेंग्युचा फैलाव वाढला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या परिसरात डेंग्युचे 12 रुग्ण असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता डेंग्युबाबत आवश्यक उपाययोजना राबविण्यासाठी वैद्यकीय पथकाची नियुक्ती करण्याची गरज आहे. मात्र, याकडे जिल्हा आरोग्य विभाग आणि महापालिका प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले असल्याने शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात रोगराईचा फैलाव झपाटय़ाने होऊनही गटारींची स्वच्छता करण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी तसेच स्वच्छता कंत्राटदारांनी साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळे शहरात संतापाची लाट पसरली आहे.