ऑनलाईन टीम /नवी दिल्ली :
कोरोनानंतर अनेक राज्यांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असून, त्यावर नियंत्रण आणणे कठीण होत आहे. त्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये केंद्रीय पथके पाठविली आहेत. या पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि डासजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी आहेत. ते राज्य संघाला तांत्रिक मार्गदर्शन करणार आहेत.
हरियाणा, पंजाब, केरळ, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये डेंग्यू नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये केंद्राची पथके पाठविण्यात आली आहेत. दिल्लीत यावर्षी आतापर्यंत 1530 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी केवळ ऑक्टोबर महिन्यात 1200 प्रकरणे नोंदवली गेली असून, गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक प्रकरणे आहेत. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आरोग्य सचिवांना डेंग्यूचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या राज्यांमध्ये केंद्रीय पथक पाठवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ही पथके रवाना झाली आहेत.
दरम्यान, पुण्यात ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे 168 रुग्ण आढळले आहेत. सप्टेंबरमध्ये 192 रुग्ण होते. चंदीगडमध्ये आतापर्यंत डेंग्यूमुळे 33 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये 1000 हून अधिक रुग्णांची पुष्टी झाली असून, त्यापैकी 68 टक्के रुग्णांची नोंद ऑक्टोबरमध्ये झाली आहे.