मण्णीकेरी ग्रामस्थांसह पत्नीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
‘पतीवर योग्य उपचार झाले नाहीत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच माझ्या पतीचा मृत्यू झाला असून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करावी’, यासाठी संबंधित महिलेने मण्णीकेरी ग्रामस्थांसह जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.
मयत सन्नाप्पा शिवाजी पाटील (रा. मण्णीकेरी) यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी रुग्ण उत्तमप्रकारे फिरत होता. मात्र शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याची प्रकृती खालावली. रामलिंग खिंड गल्ली येथील डॉक्टरांनी योग्य प्रकारे उपचार केले नाहीत. प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णाला दुसऱया हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा सल्ला दिला.
त्यांना दुसऱया हॉस्पिटलमध्ये तातडीने हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी त्यांचे निधन झाले. डॉक्टरांच्या चुकीमुळेच मृत्यू झाला असून बेजबाबदारपणे वागणाऱया त्या डॉक्टरांवर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सुरेखा पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते..
नातेवाईकांची डॉक्टरांविरूद्ध पोलिसांत तक्रार
शस्त्रक्रियेसाठी रामलिंग खिंड गल्ली परिसरातील एका खासगी इस्पितळात दाखल झालेल्या मण्णिकेरी (ता. बेळगाव) येथील एका युवकाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी खडेबाजार पोलिसांकडे तक्रार केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी दुपारी ही घटना घडली आहे. सन्नाप्पा शिवाजी पाटील (वय 41, रा. मण्णिकेरी) असे त्या युवकाचे नाव आहे. हर्नियावरील शस्त्रक्रियेसाठी सन्नाप्पाला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेच्यावेळी प्रकृती खालावल्याने त्याला आणखी एका इस्पितळात हलविण्यात आले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सन्नाप्पाचा मृत्यू झाल्याची फिर्याद त्याच्या पत्नीने दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.