वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने देशभरात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱयांवर झालेल्या हल्ल्यांची दखल घेत राज्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि प्रशासकांना पत्र लिहिले आहे. महामारी रोग (दुरुस्ती) अधिनियम 2020 अंतर्गत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱयांवर हल्ला करणाऱयांवर कारवाई करा. तसेच संबंधितांच्या विरोधात एफआयआर नोंदवा असे केंद्रीय गृहसचिवांनी पत्राद्वारे सांगितले आहे.
महामारीदरम्यान देशाच्या विविध हिस्स्यांमध्ये डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱयांवर हल्ल्यांच्या अनेक घटनांनंतर केंद्रीय गृहसचिवांनी हे पाऊल उचलले आहे. डॉक्टर, आरोग्य सेवा कर्मचाऱयांवर हल्ला त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण करू शकतो. धमकी किंवा हल्ल्याने आरोग्य कर्मचाऱयांचे मनोबल खालावू शकते असे भल्ला यांनी राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांना सांगितले आहे.
हल्ल्याच्या घटना आरोग्य सेवा प्रतिक्रिया प्रणालीवर प्रतिकूल प्रभाव पाडत असतात. याचमुळे आरोग्य कर्मचाऱयांना मारहाण करणाऱयांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी हे सद्यस्थिती पाहता अनिवार्य ठरले आहे. हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात यावा असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. महामारी रोग (दुरुस्ती) अधिनियम 2020 च्या तरतुदींनुसार डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱयांवरील हल्ल्यात सामील कुठल्याही व्यक्तीला 5 वर्षांपर्यंतच्या कैदेची शिक्षा होऊ शकते. तसेच 2 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. एखाद्या आरोग्य कर्मचाऱयाला हिंसेमुळे गंभीर ईजा झाली असल्यास गुन्हेगाराला 5 वर्षांपर्यंतच्या शिक्षेसह 5 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येऊ शकतो